नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. वेळेप्रसंगी ते आपल्यास सरकारच्या चुकाही लक्षात आणून दाखवतात. आणि अनेकदा सत्य मांडतात.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विदर्भ पाणी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी गडकरी मार्गदर्शन करीत होते. यावेळी ते म्हणाले की, ३६० कोटींचा असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पावर १२ हजार ५०० कोटी रुपये खर्च झाला असताना देखील पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्प निर्माण करणे राजकीय दृष्ट्या शक्य नसल्याचे गडकरी म्हणाले. त्यामुळे समाजासाठी काही करण्याची इच्छा असलेल्या आपणासारख्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी या सामाजिक कार्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

विदर्भात शेतीची मोठ्या प्रमाणात उत्पादकता वाढवायची असेल तर जलसंवर्धन आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक असल्याचे गडकरी पुढे बोलताना म्हणाले. विदर्भातील ६ जिल्ह्यात मागील काही काळात १० हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्येचे अध्ययन करताना सिंचनाचा अभाव तसेच कापसाचे कमी उत्पादन मूल्य अशी दोन प्रमुख कारणे निदर्शनास आली. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

मंत्री असताना विदर्भात मोठे- मध्यम अनेक सिंचन प्रकल्प निर्माण केले. प्रधानमंत्री सिंचन योजना, बळीराजा सिंचन योजनेच्या माध्यमातून १५ ते १६ हजार कोटी रुपयांची सिंचनाची कामे विदर्भात झाली असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. ग्रामीण भागाचा विकास शेतीवर अवलंबून आहे. १२-१३ टक्के शेतीच्या उत्पन्नावर तब्बल ६० तर ६५ टक्के जनता अवलंबून आहे.

शेतीवर अवलंबून असलेल्या भागातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती मागासलेली आहे. अशी परिस्थिती असल्यामुळेच आत्महत्या होत असून त्याचा संबंध पाण्याची आहे. मोठे, मध्यम, मालगुजारी तलाव सरकारी योजनेतून होतात, सरकार कोणतेही असो प्रकल्पांसाठी अपेक्षित असलेल्या निधी एकाच वेळेस देणे शक्य होत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धावणाऱ्या पाण्याला चालायला लावणे, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावणे, गावातील पाणी गावात तर शेतातील पाणी शेतात थांबेल, अशी व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थ्यांनी समाजात जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर आभार अधिसभा सदस्य डॉ. विजय इलोरकर यांनी मानले.