चंद्रपूर: जिल्ह्यातील सर्वच महामार्ग, अंतर्गत रस्ते यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. तेव्हा पाऊस ओसरताच चंद्रपूर-मुल महामार्गावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवले नाहीत तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे, असा स्पष्ट इशारा राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला.

जनतेच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणारे हे खड्डे तात्काळ भरले गेले पाहिजेत, हीच खरी लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा जीव सुरक्षित राहावा यासाठी मी नेहमीच आग्रही राहणार, असा ठाम निर्धार आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

या जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने रस्त्यांची अवस्था खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा अशी झाली आहे. चंद्रपूर नागपूर, चंद्रपूर – मूल, चंद्रपूर – राजुरा तथा इतरही अनेक मार्ग खड्ड्यांमुळे चर्चेत आहे. या खड्ड्यांमुळे मोठे अपघात देखील होत आहेत. तेव्हा खड्ड्यांची दुरुस्ती करा असा इशारा माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. यापूर्वीही आमदार मुनगंटीवार यांनी महामार्गाची पाहणी करताना बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना चांगलेच खडसावले होता. त्यानंतर रस्ते दुरुस्तीचे काम सुरू झाले होते.

मात्र पाऊस थांबत नसल्यामुळे रस्ते दुरुस्ती अर्ध्यावर राहिली आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे वाढले आहेत. तेव्हा खड्ड्यांची दुरुस्ती सुरू करा असे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले. दरम्यान, चंद्रपूर-मुल रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यासाठी आ. मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले आहे. हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्याचा निर्णय होणार असून, याठिकाणी रेल्वे ओव्हरब्रिजलाही मान्यता मिळणार असल्याचे मा.गडकरी साहेबांनी आश्वस्त केले आहे. त्यामुळे वाहतुकीचा दीर्घकाळचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

धरणाचे ३ दरवाजे उघडले

सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्याने इरई धरणाच्या पातळीत वाढ होतांना दिसत आहे. सध्याची पातळी २०७.३७५ मीटर इतकी आहे. धरणाचे तीन दरवाजे ०.२५ मीटर ने उघडले आहेत.आता अजून दोन दरवाजे ०.२५ मीटर ने उघडण्यात येत आहेत.तरी सर्व नदी लगतच्या गावांना सुचित करण्यात येते की, नदी पात्र ओलांडू नये आणि जनावरांना नदीकाठी सोडू नये. आपल्या संपर्कात असणाऱ्या सर्वांना तसे कळवावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.