नागपूर : गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यावर्षी वाघांच्या मृत्यूचा आलेख वाढत चालला आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही लगतच्या राज्यांमध्ये वाघांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान आता मध्यप्रदेशातील कान्हा अभयारण्यात एका पूरग्रस्त नदीतून एका वाघाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
मध्यप्रदेशातील कान्हा अभयारण्यात एका पूरग्रस्त नदीतून एका वाघाचा मृतदेह सापडल्याची कबूली मध्यप्रदेशातील एका अधिकाऱ्याने दिली. देशात सध्या सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातही मुसळधार पाऊस आहे. दरम्यान, पावसाळ्यात देशभरातील अभयारण्य, व्याघ्रप्रकल्पात पर्यटन बंद ठेवले जाते.
पावसामुळे कच्च्या रस्त्यावर वाहने फसण्याची भीती असते, पण त्याचवेळी वन्यप्राण्यांचा हा विणीचा, प्रजननाचा हंगाम असतो. त्यांच्या या विणीच्या काळात पर्यटनामुळे कोणतीही बाधा येऊ नये यासाठी जून ते सप्टेंबर या कालावधीत अभयारण्य, व्याघ्रपर्यटनातील पर्यटन बंद ठेवले जाते. मात्र, मध्यप्रदेशात वाघाच्या मृत्यूची एक वेगळीच घटना समोर आली आहे.
मुसळधार पावसामुळे सर्वत्र नदी, नाले दुथडीभरून वाहत आहेत. सोमवारी सायंकाळी मध्यप्रदेशातील कान्हा व्याघ्रप्रकल्पातील सामनापूर वनक्षेत्राजवळील बंजर नदीत वाघाचा मृतदेह आढळून आला. पावसामुळे या नदीला पूर आला होता आणि या पूराच्या प्रवाहात या वाघाचा मृतदेह वाहून आल्याचे दिसून आले. हा वाघ आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास या वाघाचा शोध घेणाऱ्या पथकाला तो मृतावस्थेत सापडला. दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. पावसामुळे पुर आलेल्या नदीत वाघाचा मृतदेह वाहून येण्याच्या या घटनेने सारेच आश्चर्यचकीत झाले आहे.
पुरात माणसे अडकतात, वाहून जातात, वाहने अडकतात, अशाच घटना आजवर समोर येत आहेत. मात्र, पूरग्रस्त नदीत चक्क वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. पावसाला उशिरा सुरुवात झाली असली तरी मधल्या काळात थांबलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. सर्वत्र नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्याचवेळी सोमवारी रात्री राखीव क्षेत्रातील खापा वनक्षेत्रातील मलिखेडी गावाजवळील विहिरीत वाघ पडल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली. वाघाला वाचवण्यासाठी एकाचवेळी एक पथक तैनात करण्यात आले.
विहिरीत एक खाट टाकण्यात आली आणि प्राण्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी त्यावर पिंजरा ठेवण्यात आला. वाघ जंगलात परतावा यासाठी परिसरात हत्ती तैनात करण्यात आले होते आणि परिस्थिती सामान्य होईपर्यंत गावकऱ्यांना बाहेर न जाण्याचा सल्ला देण्यात आला होता.