लोकसत्ता टीम

वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडायला तयार नसल्याचे आज पुन्हा स्पष्ट झाले. उत्सुकता लागून असलेली शरद पवार-अमर काळे यांच्यातील भेट आज सकाळी झाली. त्यात शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

महाविकास आघाडीत आमच्या पक्षासाठी विदर्भात एकच वर्धेची जागा वाट्यास आली. ती कशी सोडून देणार? दोन-तीन जागा आमच्याकडे असत्या तर विचारही केला असता. म्हणून तुम्हीच आमच्या तुतारी चिन्हावर लढा. हाच मार्ग योग्य ठरेल, असे पवार यांनी नमूद केले.

आणखी वाचा- विदर्भ आणि मराठवाड्यात आज गारपीट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा; या जिल्ह्यात “ऑरेंज अलर्ट”

त्यावर अमर काळे म्हणाले की, हा मोठा निर्णय घ्यायचा आहे. त्यावर विचार करावा लागेल. माझ्या आर्वी मतदारसंघातील सहकारी, पदाधिकारी, नेते यांच्या सोबत बोलतो. चर्चा झाल्यावर माझा निर्णय कळवितो. अमर काळे यांनी शरद पवारांबरोबर झालेल्या चर्चेतील हा तपशील लोकसत्ता ऑनलाईनसोबत बोलताना सांगितला.

शरद पवारांनी आपल्याला वेळ घ्या आणि सांगा, असे सूचित केले आहे. यामुळे सावकाश ठरेल, असेही अमर काळे म्हणाले. या भेटीत काळे यांच्या पत्नी मयुरा काळे, पुत्र अजिंक्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सहभागी होते.