नागपूर : चंद्रपूरमध्ये २०१० साली घडलेली एक धक्कादायक घटना घडली होती. यात वैभव नावाच्या एका मित्राने मंगेश नावाच्या दुसऱ्या मित्राच्या डोक्यात गोळी घालून त्याची हत्या केली होती. विशेष बाब म्हणजे, याप्रकरणी चंद्रपूर सत्र न्यायालयाने आरोपी मित्राला दोषी मानत शिक्षा ठोठावली होती. २०१२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही मित्राला दोषी मानत शिक्षा कायम ठेवली.

२०१० मध्ये घडलेली ती घटना पुन्हा चर्चेत असण्याचे कारण म्हणजे घटनेच्या तब्बल १५ वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी निर्णय दिला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या निरीक्षणाच्या उलट जात सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयातून अनेक घटनेतील अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

काय घडले होते?

वैभव आणि मंगेश हे दोघेही चंद्रपूरमधील होमिओपॅथी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी होते. सप्टेंबर २०१० मध्ये वैभवच्या वडिलांची सरकारी रिव्हॉल्व्हर हातात येताच, दोघेही तिच्याशी खेळू लागले. त्यावेळी एक गोळी सुटली आणि थेट मंगेशच्या डोक्यात जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घाबरलेल्या वैभवने मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला, रक्ताचे डाग पुसले आणि दोन मित्रांना घटनास्थळी बोलावून मृतदेह हटवण्यास मदत मागितला. या कृतीमुळे पोलिसांनी त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला. २०१२ मध्ये सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयानेही त्याला दोषी ठरवले होते.

सर्वोच्च न्यायालयात वेगळाच पैलू उघड

सर्वोच्च न्यायालयात प्रकरण पोहोचल्यावर संपूर्ण घटनाक्रमाची नव्याने चिकित्सा झाली. मंगेशच्या डोक्यातून झटकलेली गोळी थेट खोलीच्या भिंतीवर असलेल्या व्हेंटिलेटरवर जाऊन आदळली होती — जो मंगेशच्या उंचीपेक्षा खूप वर होता.न्यायालयाने निरीक्षण नोंदविले की, अशा प्रकारे गोळी फक्त त्याचवेळी वर जाऊ शकते, जेव्हा मृत व्यक्ती खाली पाहत असतो आणि अगदी जवळून गोळी झाडली जाते. यावरून निष्कर्ष काढण्यात आला की, हा आत्महत्येचा किंवा अपघाती गोळीबाराचा प्रकार असावा, हत्येचा नव्हे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि सत्यश सी. शर्मा यांच्या खंडपीठाने नमूद केले की “ही गोळी नक्कीच वैभवच्या वडिलांच्या पिस्तुलातून झाडली गेली. पण ट्रिगर कुणी ओढलं, याचा अजूनही ठोस पुरावा उपलब्ध नाही. दोन न्यायालयीन फेऱ्यांनंतरही या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही.” “हा अपघाती गोळीबाराचा प्रकार असल्याचे सर्व पुरावे सिद्ध करतात — तत्त्वतः आणि वस्तुतःही.”, असे न्यायालयाने स्पष्ट केले. अखेर न्यायालयाने वैभवला भारतीय दंडविधानाच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत निर्दोष ठरवलं. मात्र, पुरावे नष्ट केल्याबद्दल (कलम २०१) दोषी धरले. मात्र, तो आजपर्यंत जेवढी शिक्षा भोगून झाला आहे, तीच पर्याप्त शिक्षा असल्याचं सांगून न्यायालयाने त्याची सुटका करण्याचे आदेश दिले.