नागपूर : सप्टेंबरच्या मध्यान्हानंतर मान्सूनच्या परतीचे वेध लागतात. मात्र, महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने पाऊस धुमाकूळ घालत आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला आधी विदर्भ आणि मराठवाडा तर आता कोकणकडे पावसाने मोर्चा वळवला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आज सहा सप्टेंबरला हवामान खात्याने काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

धोक्याचा इशारा कुणाला ?

कोकणातील बहूतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. तर पुन्हा एकदा विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड परभणी, लातूर, तसेच धाराशिव जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी पुढील पाच दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबईसह उपनगरातही आज शुक्रवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे आणि ठाण्यासह संपूर्ण कोकणाला आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा…नागपूर : ‘पुन्हा नक्षलवाद पेटणार’ची घोषणा दिली , न्यायालयाचा अटकपूर्व जामीन….

यंदा पावसाचे प्रमाण किती?

एक ते तीन सप्टेंबरदरम्यान राज्यातील बहूतांश भागात मुसळधार पाऊस झाला. एक ते ३० ऑक्टोबरदरम्यान राज्यात जेवढा पाऊस होतो, त्यापेक्षा अधिक पाऊस यंदा जून ते ऑगस्ट या तीन महिन्याच्या कालावधीत झाला आहे. सरासरीच्या तुलनेत १२८ टक्के पाऊस यंदा पहिल्या तीन महिन्यातच झाला आहे. मान्सून अजून परतीच्या प्रवासाला लागायचाच असताना पावसाने मात्र सरासरी ओलांडली आहे. भारतीय हवामान खात्याने सप्टेंबर महिन्याचतसरासरीच्या १०९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

महाराष्ट्रातील पिकांची स्थिती काय?

कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात धान पिकांसह सोयाबीन, कापूस, मका, तूर, मूग, उडीद अशा सर्व पिकांची स्थिती सध्या चांगली आहे. मात्र, त्याचवेळी सप्टेंबरच्या पहिल तीन दिवसात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मूसळधार पाऊस झाल्यामुळे याठिकाणचे कापूस आणि सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे.

हे ही वाचा…नागपूर: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात सरकारची घोषणा, अन्यथा प्रवेशही रद्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परतीचा पाऊस लांबणार का?

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा तयार होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे परतीच्या पावसाचा मुक्काम लांबण्याची दाट शक्यता आहे. खासगी हवामान अभ्यासकांच्या मत ऑक्टोबरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही.