नाशिक : महाविकास आघाडीच्यावतीने नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला जाणार असताना महायुतीचा नाशिकचा उमेदवार निश्चित नसल्याने दिंडोरीच्या उमेदवाराचा शक्ती प्रदर्शनाद्वारे अर्ज भरण्याचा मुहूर्त काहीसा लांबणीवर पडला आहे. दोन्ही मतदार संघातील उमेदवारांचे अर्ज महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दोन किंवा तीन मे रोजी भरण्याची शक्यता आहे. स्वामी शांतिगिरी महाराज सोमवारीच विशिष्ट मुहूर्तावर शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल करणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तीन मे रोजी अर्ज भरणार आहेत.

सोमवारी महाविकास आघाडीतर्फे नाशिकमधून राजाभाऊ वाजे तर, दिंडोरीतून भास्कर भगरे हे अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने आघाडीने शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे. शालिमारस्थित शिवसेना (ठाकरे गट) कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फेरी काढण्यात येणार आहे. याच दिवशी शांतिगिरी महाराज शक्ती प्रदर्शनाद्वारे दुसऱ्यांदा विशिष्ट मुहूर्तावर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

हेही वाचा…सहानुभूतीमुळे शरद पवार यांच्या सभांना गर्दी – छगन भुजबळ यांचे मत

महायुतीत नाशिक लोकसभेच्या जागेचा संघर्ष अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे दिंडोरीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनाही अर्ज दाखल करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. दोन्ही मतदारसंघातील अर्ज दोन किंवा तीन मे रोजी शक्ती प्रदर्शन करून दाखल केले जातील, असे भाजपचे नाशिक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नाशिक लोकसभेचे उमेदवार करण गायकर हे तीन मे रोजी अर्ज दाखल करणार आहेत. पहिल्या दिवशी नाशिकसाठी ४७ इच्छुकांनी तर दिंडोरीसाठी १७ इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. तीन मेपर्यंत अर्ज वितरण आणि दाखल करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.

हेही वाचा…लेव्हीविषयी तोडगा न निघाल्यास मतदानावर बहिष्कार, माथाडी कामगारांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिकसाठी मोर्चेबांधणी सुरुच

नाशिकच्या जागेवरील उमेदवार अद्याप जाहीर झाला नसल्याने तीनही पक्षातील इच्छुकांनी शेवटच्या क्षणापर्यंत मोर्चेबांधणी चालविली आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज नेले. पण ही जागा कुणाला मिळेल, याची स्पष्टता नाही. दुसरीकडे उमेदवारी निश्चितीला विलंब झाल्यामुळे अल्प काळात कोणताही उमेदवार संपूर्ण लोकसभा मतदारसंघात प्रचार करू शकत नाही. त्यामुळे या जागेवर महायुतीने तीन वर्षांपासून प्रचार करणाऱ्या दिनकर पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील काही पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. नाशिक मतदारसंघात भाजपची ताकद आहे. तीन आमदार आणि १०० नगरसेवक आहेत. त्यामुळे ही जागा भाजपलाच मिळायला हवी, असा आग्रह संबंधितांनी धरला आहे.