लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: पालक मुलांच्या नोकरीसाठी सरकारी नोकरीसाठी वशिला लावण्यासाठी पैसे देण्यास तयार आहेत. मात्र, याचाच फायदा घेत भामटे घेत आहेत. असाच धक्कादायक प्रकार जळगावमध्ये घडला. मुलाला मंत्रालयात मोठ्या पदासह रेल्वेत कनिष्ठ अभियंतापदावर नोकरी लावून देतो, असे सांगत विमा कंपनीतील ५८ वर्षी व्यक्तीची सुमारे २२ लाखांना फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिव कॉलनीतील रहिवासी प्रवीणचंद्र दिघोळे (वय ५८, रा. शिव कॉलनी, जळगाव) यांना चंद्रभान ओसवाल व त्याचा भाऊ अनिल ओसवाल (दोघे रा. धुळे) यांनी तुमच्या मुलाला मंत्रालयात नोकरी लावून देतो, असे २०१८ मध्ये सांगितले होते. १० मे २०१८ रोजी दोघे दिघोळे यांच्या घरी येत मंत्रालयात आमचे अधिकारी परिचयाचे असून, त्यासाठी २२ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. दिघोळे यांनी दोघांना नऊ लाख रुपये रोख दिले. २७ मे रोजी पुन्हा घरी बोलावून सात लाख रुपये दिले. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी चंद्रभान ओसवाल हा बनावट नियुक्तीपत्र घेवून दिघोळेंकडे येत तुमच्या मुलाचे काम झाले असून, १८ फेब्रुवारी २०२१ रोजी कामावर रुजू केले जाणार असल्याचे त्याने सांगितले.

आणखी वाचा- सहायक फौजदारासह तीन पोलिसांना लाच स्वीकारताना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, दिघोळे मुंबईत गेले. मात्र, त्यांना कुणीही भेटले नाही. शेवटी त्यांना पुन्हा माघारी परतावे लागले. त्यानंतर दिघोळेंना ओसवाल याने तुम्हाला दुसरी नोकरी देतो, असे सांगत त्यानेच ओळख करून दिलेल्या हरताली प्रसाद रोहिदास याने दिघोळेंना मुलाला रेल्वेत कनिष्ठ अभियंतापदाचे नियुक्तीपत्र देतो, असे आमिष दाखवून सहा लाख रुपये मागितले. दिघोळेंनी हरतालीच्या बँक खात्यावर ८ ते ११ नोव्हेंबर २०२१ दरम्यान सहा लाख रुपये पाठविताच दिघोळेंच्या व्हॉट्सअ‍ॅपवर नियुक्तीपत्र पाठविले. मात्र, त्यांना कुठलीही नोकरी लावून दिली नाही. आपली फसवणूक झाल्याने दिघोळे यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या तक्रारीनुसार चंद्रभान ओसवाल, अनिल ओसवाल, हरताली प्रसाद रोहिदास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.