लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: जळगाव, मनमाड – भुसावळ विभाग रेल्वे पोलीस, सुरक्षा दल आणि सामाजिक संस्था यांच्या संयुक्त कारवाईमुळे दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून होणारी ५९ बालकांची तस्करी रोखण्यात यश आले आहे. भुसावळ आणि मनमाड रेल्वे स्थानकात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून बालकांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

बिहारमधील दानापूरहून निघालेल्या पुणे एक्स्प्रेसमधून बालकांची तस्करी होत असल्याची माहिती एका सामाजिक संस्थेने रेल्वे पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे भुसावळ विभागाचे रेल्वे पोलीस, सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस यांनी एक्स्प्रेस मंगळवारी भुसावळ स्थानकात येताच तपासणी करण्यास सुरूवात केली. वेगवेगळ्या डब्यांमध्ये बसलेल्या आठ ते १५ वयोगटातील ३० मुलांना भुसावळ येथे रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने ताब्यात घेतले. या सर्व मुलांना स्थानकात उतरवून त्यांच्या सोबत असलेल्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर भुसावळ ते मनमाड दरम्यान एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा मनमाडपर्यंत रेल्वेत शोध मोहीम करण्यात आली. यावेळी गाडीत २९ मुले आणि चार संशयित हाती लागले. त्यांना मनमाड रेल्वे स्थानकात उतरविण्यात आले.

हेही वाचा… शासन-सार्वजनिक-खासगी भागीदारीवर नाशिकचा विकास शक्य; ‘मी नाशिककर’तर्फे भविष्यकालीन आराखडा सादर

भुसावळ येथे मिळालेल्या ३० बालकांना जळगाव येथील बालसुधार गृहात पाठविण्यात आलमनमाडहून रवाना करण्यात आलेली २९ बालके बुधवारी सकाळी नाशिक येथे आली. त्यांना बालकल्याण समितीपुढे उभे करण्यात आले. त्यांचे समुपदेशन करुन नेमके काय झाले, याची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

हेही वाचा… अवाजवी घरपट्टीने धुळेकर हैराण; भाजप उपमहापौरांचा घरचा आहेर

याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातून सांगली येथे या मुलांना नेण्यात येणार होते, अशी माहिती चौकशीत या संशयितांनी दिली आहे. कोणाला संशय येऊ नये म्हणून मुलांना मदरशाचा गणवेश परिधान करण्यात आला होता. मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या ५९ मुलांच्या पालकांची माहिती काढली जात असून, ओळख पटविल्यानंतर संबंधित बालकांना पुढील आठवड्यापर्यंत ताब्यात देण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या बालकांशी संवाद साधण्यात भाषेची अडचण आली. खाणाखूणा तसेच अन्य लोकांच्या मदतीने बालकांशी संवाद साधण्यात येत आहे. बालके घाबरली असून बोलण्यास कचरत असल्याचे सांगण्यात आले.

रेल्वे पोलिसांनी भुसावळ आणि मनमाड येथे केलेल्या कारवाईत ५९ बालके सापडली आहेत. नाशिक येथे आलेल्या या बालकांशी बाल कल्याण समितीचे अधिकारी, सदस्य संवाद साधत आहेत. हा प्रकार कसा घडला, कारणे आदींची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. – सुवर्णा वाघ (रेल्वे पोलीस, नाशिक)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five suspects along with 59 children detained in the case of trafficking of children from bihar to maharashtra dvr
First published on: 31-05-2023 at 18:04 IST