नाशिक – पंचवटीत इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. विडी कामगारनगर भागात ही दुर्घटना घडली. सोमवारी अग्निशमन दलाने शोध मोहीम राबवून या मुलांचे मृतदेह बाहेर काढले.
साई गरड (१४), साई जाधव (१४) आणि साई उगले (१३) अशी या तीन मुलांची नावे आहेत. तिघेही विडी कामगारनगर भागात वास्तव्यास होते. या परिसरात कालव्यालगतच्या रस्त्याजवळ नव्या इमारतीचे काम सुरू आहे. पायासाठी खोदलेल्या विस्तीर्ण खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. सुट्टीच्या दिवशी ही मुले पाण्यात खेळण्यासाठी वा आंघोळीसाठी गेल्याचा अंदाज वर्तविला जातो. पाण्यातून ते जात असताना खोलीचा अंदाज न आल्यामुळे बुडाले असण्याची शक्यता पंचवटी विभागीय अग्निशमन केंद्राचे प्रमुख प्रदीप बोरसे यांनी व्यक्त केली.
रविवारी ११ वाजेपासून घराबाहेर पडलेली मुले सायंकाळपर्यंत घरी परतली नव्हती. कुटुंबियांसह नातेवाईकांनी आसपास सर्वत्र शोध घेऊनही ते सापडले नाहीत. अखेर कुटुंबियांनी आडगाव पोलिसांत धाव घेऊन ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी रात्री परिसरात मुलांचा शोध घेतला. सोमवारी सकाळी बांधकाम प्रकल्पाच्या खड्ड्याजवळ मुलांचे कपडे आणि चपला आढळल्या. अग्निशमन दलाच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. बोटीची मदत घेऊन पाण्यात गळ टाकण्यात आला. ११ वाजता तिन्ही मुलांचे मृतदेह हाती लागले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. या शोध मोहिमेत केंद्र प्रमुख बोरसे यांच्यासह शाम काळे, शिवाजी मतवाड, रमाकांत खारे, विजय नागपुरे हे अग्निशमन दलाचे जवानही सहभागी झाले होते.