नाशिक – पर्यावरण संरक्षणासाठी नेहमीच दक्ष असणारे नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सोमवारी सकाळी घरापासून ते कार्यालयापर्यंत जाण्यासाठी शासकीय वाहन दिमतीला असतानाही एक मोठा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने सर्वानाच सुखद धक्का बसला. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घेतलेल्या निर्णयाचे नाशिककरांकडून स्वागत करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनात वेगवेगळे उपक्रम राबवून जिल्हा प्रशासन गतिमान आणि गरजू नागरिकांना वेळेत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी शर्मा हे नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांनी शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांचा नागरी सेवा दिनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला आहे. याशिवाय एक जिल्हा- एक उत्पादन या योजनेची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांचा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी शर्मा हे पर्यावरणाविषयी नेहमीच सजग असतात. चला जाणू या नदीला, वृक्षारोपण, नदी प्रदूषण याबद्दल ते संवेदनशील असतात. अलिकडेच चामार लेणी येथे त्यांच्या हस्ते विविध रोपांची लागवड करण्यात आली. महिन्यातून किमान एक दिवस वाहन न वापरता ते कार्यालयात येतात. त्यासाठी कधी पायी, तर कधी सायकलचा वापर करतात. त्यानुसार ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी त्यांनी शासकीय वाहनाऐवजी कार्यालयात जाण्यासाठी पिंक ई रिक्षाची निवड केली.
राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी पिंक ई रिक्षा योजना आणली आहे. त्यानुसार जिल्ह्यात एक हजार महिलांना जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून पिंक रिक्षा देण्याचे नियोजन आहे.
जिल्हाधिकारी शर्मा यांनी वैष्णवी साखरे ही महिला चालक असलेल्या पिंक ई रिक्षातून जिल्हाधिकारी निवास ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा प्रवास केला. यावेळी त्यांनी रिक्षा चालविणाऱ्या वैष्णवी यांच्याशी संवादही साधला. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाणे उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धन ही सामूहिक जबाबदारी आहे. या जबाबदारीचा एक भाग म्हणून महिन्यातील पहिल्या सोमवारी वाहन न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागे प्रदूषण कमी करणे, पर्यावरण संवर्धन,इंधन बचत ही उद्दिष्टे आहेत. यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या पिंक रिक्षातून प्रवास केल्याने आनंदित झालेल्या वैष्णवी साखरे यांनी, हा आपला बहुमान असून त्यामुळे मनोबल वाढण्यास मदत झाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.