नाशिक – शहराबरोबर ग्रामीण भागात पावसाने झोडपून काढले. पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात अतिवृष्टीने नार, पारसह अनेक नद्यांना पूर आला. काही गावांचा संपर्क तुटला. मासेमारी करताना ३६ वर्षांचा युवक वाहून गेला. इगतपुरी तालुक्यात धरणांच्या पातळीत वाढ होत असून दारणा धरणातून ११०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला. पुनद, नांदूरमध्यमेश्वरमधूनही पाणी सोडण्यात आल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
मागील २४ तासात घाटमाथ्यावरील भागात मुसळधार पाऊस झाला. पेठ तालुक्यात सर्वाधिक १२२, त्र्यंबकेश्वर ११७, सुरगाणा १०१, इगतपुरी ७२, दिंडोरी ६९, बागलाण ४५, नाशिक ४५, कळवण ३४, निफाड ३१, सिन्नर २६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर भागात पावसाने दाणादाण उडवली. अनेक नद्या, नाल्यांना पूर आल्याने गाव, पाड्यांचा संपर्क तुटला. कमी उंचीच्या मोरीवरून पाणी वाहत असल्याने कामानिमित्त शेतात वा आसपास गेलेले ग्रामस्थही अडकून पडले.
पावसामुळे कसारा घाटातील वाहतूक मंदावली. पावसाचा जोर इतका आहे की, महामार्गावर दिवसाही वाहनांना दिवे लावणे भाग पडले आहे.
अतिवृष्टीत सुरगाण्यातील उदमाळ येथे शिमणू चौधरी यांच्या घराचे नुकसान झाले. ओझर येथील विठ्ठल शिंगाडे (३६) हा युवक चारी क्रमांक १६ येथे मासेमारी करीत असताना वाहून गेला. ओझर नगरपालिकेकडून त्याचा शोध घेतला जात आहे. दिंडोरी तालुक्यात धामण आणि कोलमण नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दारणा, पुनदमधून विसर्ग
पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पुनद धरणातून १२०० क्युसेक तर, दारणा धरणातून ११०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ३२२८ क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली. दिंडोरी तालुक्यात नदी, नाल्यांना पूर आला आहे. धरण परिचालन सुचीनुसार पालखेड धरणातून कादवा नदीपात्रात विसर्ग प्रवाहित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कादवा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.