नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ‘येवला मुक्तीभूमी’ या ऐतिहासिक स्थळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

ऐतिहासिक महत्व असलेल्या येवला मुक्तीभूमीला ‘ब; वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी भुजबळ हे पाठपुरावा करीत होते. हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित होता. या प्रस्तावास मंजुरी मिळून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. येवला शहर हे नाशिक-निफाड- औरंगाबाद रस्त्यावरील एक महत्त्वाचे ऐतिहासिक शहर आहे. या ठिकाणी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी धर्मातराची घोषणा केली होती.

भुजबळ यांनी येवला नगरपरिषद क्षेत्रातील मुक्तीभुमीच्या जागेचा विकास केलेला आहे. याठिकाणी दरवर्षी १३ ऑक्टोबर, विजयादशमी, १४ एप्रिल तसेच प्रत्येक पोर्णिमेच्या दिवशी लाखो अनुयायी येत असतात. त्यामुळे या जागेस तीर्थक्षेत्राचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. ही जागा मुक्तीभूमीकरीता आरक्षित आहे. या मुक्तीभूमीचा विकास सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. या ठिकाणी देखभाल आणि दुरुस्ती पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून केली जाते. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत येथे १३ कोटी रुपये खर्च करून विश्वभूषण स्तुप, भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आदी कामे करण्यात आली आहेत. दुसऱ्या टप्प्यात प्रशिक्षण केंद्र, भिख्खु निवास, भिख्खु पाठशाला, अ‍ॅम्पिथिएटर, कर्मचारी निवासस्थान, उद्यान आदी कामे प्रस्तावित आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या वतीने मुक्तीभूमीला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्याने आता या तीर्थ स्थळाच्या विकासाला अधिक वेग येईल. तीर्थस्थळाचा विकास करण्यासाठी शासनाकडूनही अधिक निधी मिळू शकेल. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने शासनाकडून मिळालेली ही भेट देशभरातील डॉ. आंबेडकर  अनुयायांसाठी अतिशय महत्वाची आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छगन भुजबळ , (पालकमंत्री, नाशिक)