नवी मुंबई : पामबीच मार्गावर एपीएमसी येथील सतरा प्लाझा इमारतीच्या आसपास गाड्यांच्या बेशिस्त पार्किंगमुळे होणाऱ्या वाहन कोंडीबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त देताच मोठी कारवाई करण्यात आली. यात सात जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले तर २२४ पेक्षा अधिक वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पामबीच मार्गावर असणाऱ्या सतरा प्लाझा आणि आसपासच्या इमारतीत चारचाकी वाहनांचे सुटे भाग आणि शोभेच्या वस्तूंची दुकाने आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क करून काम केले जाते. मात्र हे काम करत असताना वाहतूक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जाते. यात बेशिस्तीने कुठेही गाड्या पार्क करून तासंतास त्याची दुरुस्ती केली जाते. अनेकदा एकमेका शेजारी चार-चार गाड्या पार्क केल्याने अर्ध्या पेक्षा अधिक रस्ता अडवला जातो. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याला वाचा फोडण्यासाठी मंगळवारी लोकसत्ताने ‘रस्त्यावर वाहनतळ, चालकांचा छळ’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. यात विस्तृतपणे समस्या मांडण्यात आल्या होत्या.

आपल्याकडे आलेल्या ग्राहकांच्या वाहनांनी वाहतूक कोंडी होते याची जराही दखल दुकानदार वा काम करणारे कर्मचारी घेत नव्हते. तर वाहन चालकही वाहन कोंडी होऊनही गाडी तसूभरही हलवत नव्हते. ‘लोकसत्ता’त आलेल्या वृत्ताने वाहतूक पोलीस विभाग खडबडून जागा झाला. मंगळवारी दिवसभर केलेल्या कारवाईने रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.

दिवसभर सुरू असलेल्या कारवाईत तब्बल २२४ बेशिस्त वाहन पार्किंग प्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे. तर रस्त्यात अडथळा होईल अशी गाडी पार्क करून दुरुस्ती केल्या प्रकरणी सात जणांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई केवळ पामबीच सतरा प्लाझा परिसरात करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२५ जानेवारी ते ३ जून पर्यंत ४ हजार ४०२ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. २०२४ मध्ये ९ हजार ६२१ वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. यापुढेही सातत्यपूर्ण कारवाई केली जाणार आहे. – शिवाजी भांडवलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, एपीएमसी.