नवी मुंबई : पनवेल महापालिका हद्दीत येणाऱ्या वेगवेगळ्या उपनगरांमधील २३ मार्गांवर दररोज १२८ बसगाड्या सोडणाऱ्या नवी मुंबई महापालिका परिवहन प्रशासनाने यापुढील काळात या सेवांच्या विस्ताराबद्दल पुनर्विचार सुरू केला आहे. पनवेल महापालिका प्रशासनाने या बससेवेच्या बदल्यात ‘एनएमएमटी’ प्रशासनाला दिवसाला साडेसतरा लाख रुपये मोजावेत अशी परिवहन व्यवस्थापनाची भूमिका आहे. शेकडो कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची थकबाकी आणि उत्पन्नाचे मर्यादित स्रोत यामुळे महिन्याचे जमा-खर्चाचे गणित जमविताना नाकीनऊ आलेल्या पनवेल महापालिकेने एनएमएमटी व्यवस्थापनाच्या या मागणीला अक्षरश: केराची टोपली दाखवली आहे.
पनवेल महापालिका हद्दीतून प्रवासी उत्पन्न मिळते, मात्र महापालिका आपल्या मागणीला दाद देत नाही हे लक्षात आल्याने प्रवासी सेवेचा आणखी विस्तार करावा की नाही यावर आता एनएमएमटीचा विचार सुरू झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकांच्या या वादात खारघर, कामोठे, तळोजा, कळंबोली, नवीन पनवेल यासारख्या उपनगरांमधील प्रवाशांची फरफट सुरू झाली आहे. स्वतंत्र परिवहन प्राधिकरणाचा पनवेल महापालिकेचा प्रस्ताव अंमलात कधी येणार असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
पनवेल महापालिकेच्या स्थापनेपूर्वीपासून सिडको क्षेत्रात पनवेलकरांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने आपल्या खांद्यावर घेतली आहे. पनवेल महापालिकेच्या स्थापनेला ८ वर्षे उलटली. अजूनही या महापालिकेस स्वत:ची बससेवा सुरू करता आलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून एनएमएमटी व्यवस्थापनाने पनवेल आयुक्तांकडे सातत्याने पत्रव्यवहार सुरू केला आहे. यामध्ये पनवेल उपनगरातील प्रवासी सेवेमुळे आम्हाला तोटा सहन करावा लागत असल्याचे म्हणणे मांडले जात आहे.
हा तोटा कमी व्हावा यासाठी पनवेल महापालिकेने महिन्याला चार-पाच कोटी रुपयांची प्रतिपूर्ती करावी असे एनएमएमटी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. आधीच जमा-खर्चाचे गणित जमविताना कसरत करावी लागणाऱ्या पनवेल महापालिकेने एनएमएमटीच्या या पत्रांना केराची टोपली दाखवली आहे. या दोन महापालिकांच्या वादात प्रवाशांची मात्र ससेहोलटप होऊ लागली आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील उपनगरांचे गेल्या काही वर्षांत वेगाने नागरीकरण होत आहे. खारघरची एक वेस थेट तळोजापर्यत पोहचली असून रोडपाली, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल या उपनगरांचे अंतरही वाढू लागले आहे. पनवेल, खांदेश्वर यासारख्या स्थानकांपासून घरापर्यत पोहचण्यासाठी स्थानिक सार्वजनिक व्यवस्थेची या भागात वानवा आहे. खारघर स्थानक एका टोकाला तर तळोजा-खारघरची वेस दुसऱ्या टोकाला अशी अवस्था आहे.
सिडकोने मेट्रो व्यवस्थेच्या कितीही गमजा मारल्या तरी ही वाहतूक व्यवस्था अजूनही खारघर, तळोजामधील नागरिकांच्या फारशी अंगवळणी पडलेली नाही. त्यामुळे रिक्षा, शेअर रिक्षा चालकांची या भागात चलती आहे. मनमानी पद्धतीने होणारी भाडेआकारणी, भाडे नाकारणे, रिक्षा चालविण्याची पद्धत यामुळे प्रवाशांचा कल एनएमएमटीच्या गाड्यांकडे असतो. मात्र एनएमएमटी याठिकाणी सेवा वाढविण्यास तयार नाही.
वेळेवर बस मिळत नाही म्हणून खारघर, तळोजा तसेच इतर उपनगरातील रहिवाशीही एनएमएमटीच्या नावे खडे फोडतात. मात्र पनवेल महापालिका हद्दीत गाड्या वाढविणे ही आमची प्राथमिक जबाबदारीच नाही असे मत आता एनएमएमटीतील वरिष्ठ अधिकारी खासगीत बोलताना व्यक्त करू लागले आहेत. पनवेल महापालिकेने आम्हाला पैसे मोजावेत आम्ही गाड्या वाढवू अशी भूमिका एनएमएमटी प्रशासन व्यक्त करू लागले आहे.
२३ मार्गिकांवर १२८ बस
काही महिन्यांपूर्वी एनएमएमटी प्रशासनाने पनवेल पालिका आयुक्तांकडे लेखी मागणी करुन पनवेल पालिका बसफेऱ्यांमुळे एनएमएमटीला तोटा होत असून याची प्रतिपूर्ती केल्यास उत्तम बससेवा पुरवू यासाठी आग्रह धरला आहे. सध्या एनएमएमटी पनवेलमधील २३ वेगवेगळ्या मार्गिकांवर १२८ बस दिवसभरात ६३३ किलोमीटर क्षेत्रात धावतात. ८०० हून अधिक कर्मचारी व अधिकारी यासाठी काम करतात. ३४,७०० किलोमीटरचा दररोजच्या पल्ल्यावर या बस धावताना सरासरी प्रति किलोमीटर ५१ रुपयांचा तोटा एनएमएमटी प्रशासनाला सहन करावा लागल्यामुळे दिवसाला साडेसतरा लाख, तर महिन्याला सुमारे ५ कोटी ३० लाख रुपयांच्या तोट्याची प्रतिपूर्ती देण्याची मागणी एनएमएमटी प्रशासनाने पनवेल महापालिकेकडे केली आहे. वर्षाला ही रक्कम ६३ कोटी ६० लाखांवर पोहचली आहे.
बसफेऱ्या वाढवण्याविषयी अद्याप पनवेल पालिकेकडे लेखी मागणी प्राप्त झाली नाही. तशी मागणी आल्यास खात्री करुन संबंधित प्राधिकरणाकडून पालिका नक्कीच आढावा घेईल. पनवेल पालिका क्षेत्रात परिवहन सेवा सुरू करण्यासाठी पालिकेने एका एजन्सीची दीड महिन्यापूर्वी नेमणूक केली आहे. विहित वेळेत यासंदर्भात अहवाल आल्यानंतर परिवहन सेवा चालविण्याविषयीचा निर्णयाचे धोरण ठरु शकेल.
– कैलाश गावडे, उपायुक्त (परिवहन विभाग), पनवेल महापालिका