|| विजय राऊत
मेंढवन ते आच्छाड मार्गावर पाच वर्षांत १००७ अपघात तर १०४ जणांचा मृत्यू
कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन ते आच्छाड या ५० किमी अंतरात महामार्गाच्या सदोष बांधकामामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये १००७ अपघात घडले असून, १०४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ८१२ जण जखमी झाले आहेत. महामार्गावरील धोकादायक वळणामुळे हे अपघात होत आहेत. महामार्ग पोलिसांनी याबाबत वारंवार सूचना देऊनही आयआरबी प्रशासन तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे हा मार्ग अपघातप्रवण क्षेत्र बनला आहे.
मुबंई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन, सोमटा, चारोटी, महालक्ष्मी, आंवढानी, आंबोली, वडवली, तलासरी, आच्छाड या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात वाढत आहेत. काही ठिकाणी तीव्र उतरावर वळणे, काही ठिकाणी अपघाती वळणे आहेत. तसेच या ठिकाणी सूचनाफलक नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे.
गूगल नकाशानुसार पाहिले तर मेंढवन ते आच्छाड या ५० किमी अंतराच्या महामार्गावर मेंढवन, चारोटी, धानिवरी आणि आमगाव या ठिकाणी तीव्र उतार व वळण असल्याचे दिसते. या ठिकाणी दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. अपघात झाल्यानंतर काही तास वाहनचालकांना तसेच प्रवाशांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. काही वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवत असल्यामुळेही अपघात घडतात. त्यामुळे पुन्हा दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी होते. टोल भरूनसुद्धा वाहनचालकांना आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो, अशी तक्रार आहे.
या महामार्गावर अपघात झाल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ उपचार केंद्रात दाखल करण्यासाठी आवश्यक ती सेवा देण्यासाठी टोल वसूल करणाऱ्या आयआरबी कंपनीकडे पाहिजे त्या प्रमाणात मनुष्यबळ तसेच क्रेन आणि रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे अनेक प्रवासी, तसेच वाहनचालकांना मृत्यूला सामोरे जावे लागते. या संदर्भात आयआरबी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
मेंढवनमध्ये अपघाताचे
प्रमाण अधिक
गेल्या पाच वर्षांत मेंढवन ते आच्छाड या ५० किमीच्या रस्त्यावर मेंढवन भागात ४२१ अपघात झाले असून यामध्ये २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २८९ प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच चारोटी या ठिकाणीही ३०२ अपघातामध्ये ३२ मृत्यू झाले तर २८५ चालक, प्रवासी जखमी झाले आहेत. धानिवरी या ठिकाणीही १२० अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू तर ११० जण जखमी झाले आहेत. आंबोली-तलासरी परिसरातसुद्धा १६४ अपघातामध्ये ३४ जणांचा मृत्यू व १२८ जण जखमी झाले आहेत.
या महामार्गावर अनेक ठिकाणी तीव्र उतार तसेच वळणे असल्यामुळे अपघात घडत आहेत. आयआरबी प्रशासनाला याबाबत सूचना केल्या आहेत. काही चालक रस्त्याच्या बाजूला लावलेल्या सूचना फलकांकडे लक्ष देत नाहीत त्यामुळेसुद्धा अपघात होत आहेत. तसेच गेल्या वर्षापेक्षा १० लाखांहून जास्त वाहनांची संख्या वाढली आहे. तसेच अपघात कमी व्हावेत यासाठी अतिवेगात वाहन चालवणारे, सीटबेल्ट न लावनारे, हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांवर महामार्ग पोलीस कारवाई करत आहेत. -अनिल रायपूरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस चारोटी