नीरज राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर: भात उत्पादनात नेहमीच आघाडीवर असलेल्या पालघर जिल्ह्यात पावसाने ओढ घेतल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. या जिल्ह्यात ७९ हजार हेक्टर जमिनीवर भाताची लागवड होते. मात्र, पावसाच्या उघडपीमुळे उत्पादनाचे गणितच चुकू लागले असून काही ठिकाणी या पिकांवर कीटक व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहेत. तसेच शेतामधील तण वाढल्याने शेतकऱ्यांसाठी नवीन आव्हाने उभी राहिली आहेत.

जून महिन्याचे पहिले तीन आठवडे कोरडे गेल्यानंतर जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाल्याने जुलैच्या अखेरीपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या १५६ टक्के पावसाची नोंद झाली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप घेतली आहे. २६ ऑगस्टपर्यंत या हंगामातील पावसाने सरासरी राखली असली तरीही ऑगस्ट महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत विक्रमगड, वसई, वाडा व पालघर या तालुक्यांत ३० टक्क्यांपेक्षा कमी, जव्हार व तलासरी तालुक्यांमध्ये ३० ते ४० टक्के, तर मोखाडा व डहाणू तालुक्यात ४५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा >>>राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी बसचा अपघात

‘आणीबाणीची परिस्थिती नाही’

भात पीक सध्या निर्णायक स्थितीत असून येत्या आठ-दहा दिवसांत भात पिकाला फुटवे येण्याचा टप्पा येईल. अशा वेळी जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा असणे आवश्यक असून पावसाच्या नियमित सरी पडणे तसेच काही दिवस तरी दमदार पावसाची आवश्यकता भासणार आहे. पालघर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पाऊस समाधानकारक झाला नसला तरी अनेक ठिकाणी दोन ते पाच मिलिमीटर पावसाची नियमित नोंद होत आहे. शेतकरी चिंतेत असला तरीही जिल्ह्यात अजूनही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली नसल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने संकेत दिल्याने भातशेतीसाठी आशादायक स्थिती निर्माण झाली आहे, असे सांगितले.

हेही वाचा >>>पक्षांतर्गत फुटीसाठी अर्थपूर्ण प्रयत्न; पालघर शहरासाठी १० कोटींचे राजकीय पॅकेज?

खत टंचाई..

रोपांची वाढ जोमाने होण्यासाठी पावसासोबतच रासायनिक खतांना मागणी वाढली असून कृषी सेवा केंद्रांत शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. दरम्यान अनेक कृषी सेवा केंद्रात खते उपलब्ध नसल्याचे फलक झळकले असून ऐन वेळी खताची टंचाई भासू लागल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

तण वाढल्याने डोकेदुखी..

जिल्ह्यामध्ये २५ पावसाळी दिवसांची नोंद झाली असली तरीही त्यामध्ये वसई व पालघर येथे १२ ते १६ दिवसच पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी भातपिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून सूर्यप्रकाश असल्याने भाताबरोबर तणाची वाढ झाल्याने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers in palghar waiting for rain amy
First published on: 28-08-2023 at 04:55 IST