वाडा : “भिवंडी- वाडा- मनोर” या ६४ किमी महामार्गाची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आजपर्यंत कोट्यवधींचा खर्च होवून देखील रस्ता सुस्थितीत झाला नाही. याकडे शासन व प्रशासन, लोकप्रतिनिधी व कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबाबत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व कोट्यवधींच्या खर्चाचा हिशोब मागण्यासाठी “श्रमजीवी संघटनेने” आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

या रास्ता रोको आंदोलनाला (२६ जुन) सकाळी ११ वाजल्यापासून सुरुवात झाली असुन ते वाडा तालुक्यातील खंडेश्वरी नाका, शिरीष फाटा, कुडूस, डाकिवली फाटा तर भिवंडी तालुक्यातील अंबाडी, नांदीठणे फाटा, कवाड नाका, मालोडी येथे करण्यात आले आहे. या आंदोलनात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. आंदोलकांनी ७ तासांपासून महामार्ग रोखून धरला आहे.

रास्ता रोको आंदोलनावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी अधिक पोलिस कुमक मागीविली असुन आंदोलनाच्या ठिकठिकाणी पोलिस तैनात केले आहे. स्थानिक प्रशासन देखील आंदोलन ठिकाणी जाऊन आंदोलकांची भेट घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.

यात वाडा तालुक्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी वाडा उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप चव्हाण जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठाणे अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, पालघरचे उपअभियंता पोपटराव चव्हाण आंदोलनावर बारकाईने लक्ष ठेवून असून ते चर्चा करत आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची व श्रमजीवी संघटनेने सोबत बैठक सुरू असुन अद्यापपर्यंत कुठलाही तोडगा निघाला नसल्याची माहिती पालघरचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पोपटराव चव्हाण यांच्याकडून मिळाली आहे.

भिवंडी – वाडा – मनोर या रस्त्यावरून प्रवास करताना गेल्या १२ वर्षात झालेल्या हजारो अपघातात ५०० हून अधिक निष्पापांचे बळी गेले आहेत, तर हजारो लोकांना अपंगत्व आले आहे. आजही या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांना पाठदुखी, मानदुखी कंबरदुखीचा त्रास होऊ लागला आहे. तर हा त्रास आजही सहन करावा लागतो शिवाय वाहतूक कोंडीमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिक व प्रवासी यांना देखील मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

मागील १२ वर्षात या रस्ता दुरुस्तीसाठी शासनाने विविध एजन्सी माध्यमातून कंत्राट देऊन आतापर्यंत जवळपास ८०० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला. सोबतच अनेक सामाजिक संस्था, राजकीय संघटनानी, ग्रामस्थांनी उपोषणे, मोर्चे, रास्ता रोको, आंदोलन केले. मात्र तरीही रस्ता सुस्थितीत झाला नाही. मग हा खर्च नक्की कुठे गेला असा प्रश्न उपस्थित करत चौकशी करण्याची मागणी आली आहे.

नुकताच “ईगल इन्फ्रास्ट्रक्चर” या कंपनीला या रस्त्याचे नूतनीकरणासाठी कॉंक्रिटीकरणाचे ७७६ कोटींचा कामाचा ठेका दिला आहे. मात्र या कंत्राटदाराने देखील पूर्वीचा रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक असताना ती वेळीतच केली नाही. म्हणून वाहन चालकांना, प्रवाशांना रस्त्यावरील खड्ड्यांमधून प्रवास करण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, या रस्त्याच्या दुरवस्थेला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नेमलेले एजन्सीचे कंत्राटदार, लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा आरोप “श्रमजीवी संघटनेने” केलेला आहे. दरम्यान, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी खर्च होवून देखील समस्या “जैसे थे”च राहिल्याने या समस्येकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.

रास्ता रोको आंदोलनामुळे एसटी बस सेवा ठप्प, तर शासकीय कामकाजावर परिणाम.

“भिवंडी- अंबाडी – कुडूस – वाडा या ४४ किमी अंतरावरील महामार्गावर ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू केल्यानंतर आंदोलकांनी जवळपास ६ तास महामार्ग रोखून धरला. त्यामुळे एसटी बस सेवा ठप्प झाली. वाडा एसटी बस स्थानकात बसेस दिसून येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे, कल्याण, भिवंडी, वसई, पालघर, बोईसर, डहाणू येथे जाणाऱ्या व आगारांच्या एसटी बस सोबतच लांब पल्ल्यांच्या एसटी बस अडकल्याने रद्द झाल्या. त्यामुळे एसटी बस मधून प्रवास करणारे चाकरमानी, शालेय विद्यार्थी, प्रवासी यांची मोठी गैरसोय झाली. तर अत्यंत महत्वाचे काम असणारे नागरिकांची वाहने देखील या रास्ता रोकोमुळे अडकून पडली. शासकीय कार्यालयातील कामकाजांवर विपरीत परिणाम झाला. तहसील व प्रांत कार्यालयात होणाऱ्या सुनावण्या पुढे ढकलण्यात आल्या. तर रास्ता रोकोची परिस्थिती पाहता खाजगी शाळांना सुट्ट्या देण्यात आली होती.