पालघर: पालघर जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी ७८.६३ टक्के मतदान झाले. मंगळवारी निवडणुकांचा निकाल लागणार असून मतदानापूर्वी राजकीय पक्षांनी ग्रामपंचायती जिंकण्याच्या केलेल्या दाव्यांचे चित्रही यावेळी स्पष्ट होणार आहे. कोण किती जागा जिंकणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील ३१, वसई तालुक्यातील १५, वाडा तालुक्यातील १४ व तलासरी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीकरिता निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. या निवडणुकीत सकाळपासून सातत्याने मतदाराने सहभाग घेतला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६७ टक्के मतदान झाल्याचे दिसून आले होते. पालघर तालुक्यात ७७.३८ टक्के, वसई ७६.३४ टक्के, वाडा ८६.९७ टक्के तर तलासरी तालुक्यात ८६.११ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत ५०५ सदस्यांच्या निवडीसाठी १२५४ उमेदवार रिंगणात असून मंगळवारी तालुका निहाय मतमोजणी होणार आहे.