मुख्यालयात न राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींद्वारे दक्षता

पालघर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आवश्यक औषध साठा, सर्प दंश व इतर लसींचा साठा करिता आवश्यक निधी उपलब्ध असताना तज्ञ डॉक्टरांच्या अभावी जिल्ह्यातील रुग्णांना आवश्यक दर्जेचा औषध उपचार मिळत नाही. विविध आरोग्य संस्थेत असलेल्या रिक्त जागांकरिता पूर्ण वेळ वा कंत्राटी पद्धतीने तज्ञ डॉक्टर मिळत नसल्याने जिल्ह्यातील खाजगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांनी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात महिन्यातून किमान एक दिवस द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यासाठी आपल्यासह लोकप्रतिनिधी हे डॉक्टरांकडे सेवेकरिता भिकयाचना करण्याचा उपक्रम राबविणार असल्याची घोषणा पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> शहरबात : पावसाळी पर्यटनावर नियंत्रणाची गरज

जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थिती नंतर आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, आमदार विनोद विकोले, आमदार राजेश पाटील, आमदार श्रीनिवास वनगा तसेच जिल्हा परिषद विषय समितीचे सभापती संदेश ढोणे, संतोष पावडे तसेच अधिकारी वर्ग उपस्थित होता.

पालघर शहरात झालेल्या सर्पदंश मृत्यूबाबत आढावा घेताना तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याचा मुद्दा चर्चेला आला. एमबीबीएस शिक्षण झालेले डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय आस्थापनेत काम करण्यास उत्सुक नसल्याचे राज्यात सर्वत्र अनुभव असल्याने स्थानीय पातळीवर उपलब्ध असलेल्या अनुभवी व तज्ञ डॉक्टरांच्या सेवेची भिक मागावी असा विचार त्यांनी मांडला. अशा खाजगी डॉक्टरांच्या उपलब्धतेनुसार त्यांना शासकीय रुग्णालयात ने- आणण्यासाठी तसेच त्यांच्या खानपानाची व्यवस्था जिल्हा प्रशासन करेल असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. या विचाराला उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी सहमती दर्शवून आपणही या लोकसेवेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या प्रकल्पात सहभागी होऊ असे आश्वासित केले. वैद्यकीय क्षेत्राला उदात्त व्यवसाय असे संबोधले जात असून अशा क्षेत्रातील मंडळींनी समाजसेवेसाठी आपला सहभाग द्यावा असेही पालकमंत्री यांनी पुढे सांगितले.

मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई

जिल्ह्यात झालेल्या पूर परिस्थितीत आपत्कालीन यंत्रणा पुरेशा पद्धतीने कार्यक्षम नसल्याचे पालकमंत्री तसेच उपस्थित लोकप्रतिनिधींनी या बैठकीत नमूद केले. अधिक तर अधिकारी व कर्मचारी आपल्या मुख्यालय ठिकाणी राहत नसल्याचे आपल्या निदर्शनास आले असून अशा संबंधितांवर कारवाई करण्यासाठी लोकप्रतिनिधींद्वारे दक्षता ठेवण्याची योजनेची पालकमंत्री यांनी या बैठकीत घोषणा केली. सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यामार्फत जिल्हाधिकारी किंवा तत्सम अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्याची तातडीने शहानिशा करावी व मुख्यालय ठिकाणी न राहणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश निर्गमित करण्याच्या सूचना पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना दिल्या.

दळणवळण पुनर्स्थापित करण्याचे आदेश

जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गाव खेड्यांचा संपर्क मुख्य गावांशी तुटल्याने शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशा सर्व गावपाड्यांचा संपर्क तातडीने पुनरस्थापन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाने उपाय योजना आखण्याच्या पालकमंत्री यांनी सूचना दिल्या.

जिल्ह्याचा भाताच्या सुमारे ७२ टक्के तर नागलीच्या सुमारे ५२ टक्के रोपणी झाली असून विशेषता जव्हार व वाडा तालुक्यात 700 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात खरीप पिकांचे नुकसान झाल्याचे अंदाजीत आहे. पावसाने उघड घेतली असल्याने पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामा करावेत तसेच जिल्ह्यातील नुकसानीचा घोषवारा मंगळवार सायंकाळपर्यंत शासनाकडे सादर करावा असे देखील पालकमंत्री यांनी सूचित केले. ज्या ठिकाणी पाणी साचले होते किंवा घरामध्ये पाणी शिरले होते अशा ठिकाणाची पंचनामे तातडीने पूर्ण करून बाधितांना धान्य वाटप करावे असे देखील सांगण्यात आले. तसेच पडझड झालेल्या घरांचा पूर्ण मोबदला द्यावा असे पालकमंत्री यांनी सुचविले.

हेही वाचा >>> धामणी धरणाचे पाच दरवाजे दीड मीटरने उघडले, नदीपात्रातील गावांना सतर्कतेचा इशारा

सेलवास रुग्णालयाशी संलग्न करारनामा करण्याची विचाराधीन पालघर येथे जिल्हा सामान्य रुग्णालय व तज्ञ डॉक्टरांची सुविधा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील अनेक रुग्णांना उपचारासाठी लगतच्या केंद्रशासित प्रदेश अथवा गुजरात मध्ये जावे लागत असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी निदर्शनास आणून दिले. ज्या पद्धतीने रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना गोवा येथील शासकीय रुग्णालयांशी संलग्न करण्यात आले आहे, त्याच धर्तीवर पालघर जिल्ह्यातील रुग्णांकरिता सेलवास येथील रुग्णालयाशी संलग्नता मिळवण्यासाठी करू असेही पालकमंत्री यावेळी सांगितले.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palghar guardian minister ravindra chavan appeal private doctors to give service in government hospital zws
First published on: 30-07-2023 at 14:34 IST