सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे पालघर हा पर्यटन जिल्हा व्हावा या दृष्टीने सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ११४ किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेल्या या जिल्ह्याच्या किनाऱ्यालगतच्या भागात मोठ्या प्रमाणात हॉटेल व रिसॉर्ट व्यवसाय उभा राहिला आहे. मुंबई, ठाणे, नाशिक तसेच गुजरात राज्यातील पर्यटकही या भागात आकर्षित होत आहेत. मात्र मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात केळवे विभागात घडलेल्या दोन घटनांमुळे येथील पर्यटन व्यवसायाला गालबोट लागले आहे.
२३ मे रोजी केळवे येथील एका रिसॉर्टमध्ये २७ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला. सायंकाळी साडेचार वाजल्याच्या सुमारास फ्राइड राइस अथवा बिर्याणी खाताना चिकनचा तुकडा घशात अडकल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस तसेच हॉटेल व्यवसायिक मांडत आहेत. मात्र मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी काढलेल्या छायाचित्रांमध्ये मृत महिलेच्या कानातून रक्त येत असल्याचे दिसून आले. ३० मे रोजी घडलेल्या अन्य एका घटनेत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मानेमध्ये पिस्तूलची गोळी लागली. या मुलीवर तातडीने शस्त्रक्रिया केल्याने तिची प्रकृती स्थिर झाली.
जिल्ह्यातील अधिकतर किनारे निसर्गरम्य असून त्याची मजा घेण्यासाठी तसेच या भागात मिळणाऱ्या रुचकर खाद्यपदार्थांमुळे शहरी भागातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येत असतात. वेगवेगळ्या आस्थापनाचे समूह, कुटुंब सहली एक दिवसीय मौजमजेसाठी किनाऱ्यालगतची ठिकाण पसंत करतात. तर दातिवरेसारख्या दूरवर भागातही पर्यटक जाणे पसंत करत आहेत.
आठवडाअखेरीस बहरणारा व्यवसाय पूर्ण आठवडाभर सुरू राहावा यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले असले तरीही त्याला आजवर यश लाभले नाही. त्यामुळे आठवड्याच्या मधल्या दिवशी अशा रिसॉर्ट्स हॉटेलमध्ये गर्दी पाहायला मिळते. समाजमाध्यमांमधून प्रभावित झालेल्या तरुण वर्गावर अंकुश ठेवण्यासाठी परिसरातील देवस्थान संस्थांना कठीण झाले आहे. शिवाय हंगामी का असेना निवासाची सोय देताना त्यांच्या वयाची अट गांभीर्याने तपासणे आवश्यक असून त्याचेदेखील उल्लंघन होत असल्याचे घडलेल्या गैरप्रकारावरून समोर आले आहे.
जिल्ह्याच्या रेल्वेलगतच्या भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून अशा ठिकाणी परप्रांतीयांकडून गावठी कट्टे, पिस्तूल, रिव्हॉल्वर सहजपणे आणले व बाळगले जातात. मनोरजवळील एका जंगलात शिकारीला गेलेल्या एका स्थानिकाला अशीच गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना केळवे येथील एका १७ वर्षीय मुलीच्या मानेमध्ये पिस्तुलाची गोळी शिरली. केळवे येथे घडलेल्या या दोन्ही घटनांबद्दल पोलिसांची भूमिका ही सारवासारव करण्याची असून आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी देण्यात येणारे संरक्षण प्रथम थांबवणे गरजेचे झाले आहे. आपण स्वतःहून स्वतःवर गोळी झाडली ही जखमी अवस्थेत मुलीने जबानी दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, मात्र विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगली गेली व अल्पवयीन मुलीला निवासाची खोली देण्यात आली हे सत्य लपवू शकले नाही. पोलिसांनी आता घटनाक्रम बदलला असून पिस्तूल हाताळताना हा प्रकार झाल्याचे म्हणणे आहे.
केळवे येथे या व्यवसायाची वृद्धी व्हावी म्हणून केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघ स्थापन करण्यात आला असून त्याचे ५० पेक्षा अधिक सदस्य आहेत. पर्यटन मंत्रालयाने सहा खोल्यांपर्यंत निवास व्यवस्था करण्याची अनुमती दिली आहे. त्यापेक्षा अधिक निवास व्यवस्था असल्यास आवश्यक शासकीय विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. तर कृषी पर्यटनाचा व्यवसाय करणाऱ्यांना आठ निवासी खोल्या उभारण्याची मुभा देण्यात आली आहे. असे असताना या प्रत्येक निवास व्यवस्था उभारणाऱ्यांनी येणाऱ्या पर्यटकांची तपशीलवार माहिती व पुरावे संकलित करून त्यांच्या नोंदी रजिस्टरमध्ये करणे आवश्यक आहे, मात्र केळवेसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरगुती निवासाच्या ठिकाणी काही खोल्या भाडेतत्त्वावर घेण्याचे सुरू असून अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या नोंदी केल्या जात नाहीत. केळवे येथे घडलेल्या या दोन प्रकारांनंतर अनेक अनधिकृत व विनापरवाना असणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनांचे फलक काढून टाकल्याने अशा गैरप्रकारांना पुष्टी मिळाली आहे.
जिल्ह्यात पर्यटनाचा विकास होत असताना गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलीस व इतर शासकीय विभागांची असून हॉटेल व रिसॉर्ट व्यावसायिकांनी सामाजिक भान ठेवणेदेखील तितकेच आवश्यक झाले आहे. पालघर जिल्ह्यात असणाऱ्या नैसर्गिक विविधतेकडे पाहता निखळ पर्यटन व्यवसाय चालवणे या व्यवसायाच्या दीर्घकालीन वृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.