पालघर : जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या उंचीचा लाटा उसळणार असल्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार २५ जून रोजी सातपाटी समुद्रकिनारपट्टीवर आलेल्या उधाणामुळे घरांमध्ये पाणी शिरल्याची घटना घडली. तसेच पुढील काही दिवस डहाणू, सातपाटी व केळवे या समुद्रकिनारी गावांना मोठ्या लाटांची शक्यता असल्याने धोका संभवत आहे.
२४ ते २९ जून दरम्यान समुद्रात पाच मीटर पेक्षा मोठ्या उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगत असणाऱ्या सातपाटी, केळवे व डहाणू या ठिकाणच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. २५ जून रोजी सातपाटी येथील समुद्रकिनारपट्टीवर आलेल्या उधाणामुळे विशाल मंडळ भागातील अनेक घरांमध्ये व रस्त्यावर समुद्राचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती.
उधाणामुळे उसळलेल्या लाटा इतक्या शक्तिशाली होत्या की, गावातील बंधाऱ्यावरून पाणी थेट वस्तीत आले. काही ठिकाणी तर या लाटांमुळे बंधारा पाण्याखाली दबला गेल्याचे स्थानिकांनी सांगितले. पाण्याच्या वाढलेल्या पातळीमुळे किनारपट्टीवरील घरांचे मोठे नुकसान झाले असून, घरात पाणी शिरल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे.
पुढील काही दिवस अधिक सतर्कतेचा इशारा
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही समुद्राला उधाण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातपाटी आणि पालघर जिल्ह्यातील इतर किनारपट्टी भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी समुद्राजवळ जाणे टाळावे आणि आपल्या घरांची तसेच मालमत्तेची काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पुढील महिन्यातील भरती
जून महिन्यानंतर देखील १० ते १५ जुलै, २३ ते २८ जुलै, ८ ते १३ ऑगस्ट, २२ ते २६ ऑगस्ट, ६ से ११ सप्टेंबर व २४-२५ सप्टेंबर दरम्यान सातपाटी समुद्रकिनाऱ्यावर पाच मीटर पेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे जारी केलेल्या भरतीच्या वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये असणारा वेगवान वारा तसेच खाडी मधून मोठ्या प्रमाणात समुद्रात मिसळणारे पाणी यामुळे या लाटांची तीव्रता वाढत असून यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील जैवविविधतेला नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे.