मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘बिनशर्त पाठिंबा’ जाहीर केल्यानंतर मनसेतील शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटाकडे ओढा वाढू लागला आहे. दादर येथील शिवसेना भवन मध्ये ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची संख्या वाढू लागली असून स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे स्वागत करीत आहेत.

दोन दिवसापूर्वी पनवेल मधील काही मनसे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. कोकणातील मनसे संपवण्याचे काम करणाऱ्या सुनील तटकरे यांचे काम आम्ही कसे करु अशी भूमिका सरचिटणीस वैभव खेडकर यांनी जाहीरपणे मांडून कोकणातील मनसे कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पक्षाचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनीही पक्षाला रामराम ठोकला.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांवर टीका करत राज ठाकरे यांनी १८ वर्षापूर्वी मनसेची स्थापना केली. त्यावेळी राज ठाकरे यांच्या बरोबर जाणारे कार्यकर्ते हे शिवसेनेचे होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी ‘चिमण्यांनो परत या’ अशी हाक दिली मात्र राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांनी साथ सोडली नाही. दहा वर्षापूर्वी मनसेच्या काही आजी माजी आमदारांनी पक्ष सोडला पण कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या सोबत असल्याचे चित्र होते. ‘लाव रे तो व्हिडीओ’ चे आदेश देत मोदी शहा यांच्यावर सडकून टीका करणाऱ्या ठाकरे यांनी नंतर वेळोवेळी बदलेली भूमिका अनेकांना आर्श्चयचकीत करणारी आहे. गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत मोदी यांना पाठिंबा जाहीर करताना त्यांनी महायुतीतील अजित पवार व शिंदे गटावर टीका केली. काश्मिर मधील अनुच्छेद ३७० रद्द करणे, राम मंदिर उभारणी, समान नागरी कायदा यासारख्या मुद्दयावर मोदी यांना पांठिबा दिला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांच्या या बिनशर्त पाठिंब्याच्या घोषणेनंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकत आहेत.

हेही वाचा… बॉलीवूड रॅपर, सापाच्या तस्करी प्रकरणात नाव आणि आता लोकसभेची उमेदवारी

पनवेल मधील मनसे कामगार सेनेचे प्रशांत अनगुडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर कोकणातील मनसेच्या कार्यकर्त्यांच्या भावनेला सरचिटणीस खेडेकर यांनी वाट करुन दिली. राज ठाकरे यांचे आदेश मान्य आहेत पण ज्यांनी कोकणातील मनसे संपवली. कार्यकर्त्यांवर खोट्या पोलिस तक्रारी दाखल केल्या. नगरसेवक फोडले त्या तटकरे यांचा प्रचार कसा करायचा असा प्रश्न खेडकर यांनी उपस्थित केला. मुंबई, पुणे, नाशिक या शहरात काही ठिकाणी प्रभाव असलेल्या मनसेच्या कार्यकर्ते या पाठिंब्यावर नाराज आहेत. त्यामुळे पुण्यात अमित ठाकरे यांना मनसे कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांचे काम करण्यासाठी आवाहन करावे लागले.

हेही वाचा… नवरा तुरुंगात, बायको निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत श्रीकला रेड्डी?

इतर पक्षातील खासदार आमदार सोडून गेले. त्यात एक दोन कार्यकर्ते पक्ष सोडून गेले त्याची इतकी चर्चा कशासाठी. मनसे मधून गेलेल्या कार्यकर्त्यांची उध्दव ठाकरे स्वागत करीत आहेत. ते पूर्वी आमदार खासदारांना भेटत नव्हते. ते मनसेच्या कार्यकर्त्यांना भेटत आहेत. राज ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन घेतला आहे. यापूर्वी त्यांनी अंधेरी येथील पोटनिवडणूक, वरळी येथील विधानसभा निवडणूक, ठाणे महापैार निवडणूकी ठाकरे गटाला सर्मथन दिले होते. त्यावेळी ही ओरड केली गेली नाही. – गजानन काळे, प्रवक्ते, मनसे