काँग्रेस राजवटीच्या काळात नागपूर जिल्हा परिषदेत झालेल्या विकास कामांची गुणवत्ता तपासणी करण्याचे सुतोवाच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. याच धर्तीवर भाजपची सत्ता असताना नागपूर महापालिकेत झालेल्या कामांचीही चौकशी करण्याची हिम्मत पालकमंत्री दाखवतील का? असा सवाल काँग्रेसच्या वर्तुळातून केला जात आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा परिषदेतील काँग्रेस नेते,पदाधिकाऱ्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावण्यासाठी भाजपकडून दबावाचे राजकारण केले जात आहे, असा आरोपही केला जात आहे.

नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्हा परिषदेने केलेल्या कामांचे व्हीएनआयटीकडून तपासणी करण्याचे सुतोवाच केले आहे. त्यासाठी त्यांनी जिल्ह्यात झालेल्या काही सरकारी इमारतीच्या बांधकामाचा हवाला दिला. ही कामे करताना गुणवत्ता राखली गेली नाही, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली व मागील तीन वर्षात झालेल्या कामांची गुणवत्ता तपासणी करणार असल्याचे सांगितले. वरवर हा प्रकार कामाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी मंत्र्यांनी घेतलेला पुढाकार असल्याचे वाटत असले तरी कामांच्या तपासणीसाठी निवडलेला कालावधी लक्षात घेतला तर मंत्र्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर डोळा ठेवून घेतलेला हा निर्णय असल्याचे स्पष्ट होते.

भाजपचा डाव

२०२४ या काळात नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता होती. सध्या तेथे प्रशासक आहे, पुढच्या चार महिन्यात नव्याने निवडणुका अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यानी केलेले सुतोवाच निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची कोंडी करण्यासाठी केल हे स्पष्ट आहे. २०१९ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सुनील केदार यांनी भाजपच्या ताब्यात असलेली जिल्हा परिषद खेचून आणली होती. तेंव्हा पासून भाजप अस्वस्थ आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने काँग्रेसची सत्ता असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेची आर्थिक कोंडी करणे सुरू केले. निधी रोखला, त्यामुळे केंद्राकडून जो काही निधी विविध योजनांसाठी येत होता त्यातूनच कामे झाली. या कामांची तपासणी करणार असे आता पालकमंत्री म्हणत आहेत. जिल्हा परिषदेतील तत्कालीन पदाधिकाऱ्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी केलेला हा प्रयत्न असल्याचा दावा ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेच्या कामांचे काय ?

मागील तीन वर्षात झालेल्या जिल्हा परिषदेतील कामाची गुणवत्ता तपासणी करण्याचे सुतोवाच पालकमंत्र्यांनी केले, मात्र मागील १५ वर्षापासून महापालिकेत भाजपचीच सत्ता असून तेथे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे, मात्र येथील कामांच्या तपासणीबाबत पालकमंत्री का बोलत नाही ? असा सवाल आता शहर काँग्रेसचे प्रवक्ते अभिजित झा यांनी केला आहे. सिमेट रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. रस्त्यांना तडे गेले आहे, पावसाळापूर्व नियोजन नीट न केल्याने २०२३ मध्ये नागपूरमध्ये पूर आला होता. लाखो रुपयांची हानी नागपूरकरांची झाली. मदत वाटपातही गैरप्रकार झाले. चोवीस तास पाणी पुरवठा योजनेतही रोज आरोप होत आहेत, किमान यापैकी एकाद्या प्रकरणाची तरी सरकारने चौकशी करावी, पण तशी हिम्मत पालकमंत्री दाखवू शकणार नाही, असे झा म्हणाले.