Chirag Paswan on Bihar Election 2025 : हरियाणा व महाराष्ट्रापाठोपाठ दिल्ली विधानसभेची निवडणूक जिंकून विजयाच्या गतीवर स्वार झालेल्या भाजपाने आता आपलं लक्ष्य बिहारकडे वळवलं आहे. यावर्षीच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, त्याआधी भाजपाची चांगलीच डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात असलेले लोक जनशक्ती पार्टीचे नेते व केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी त्यांना राज्याच्या राजकारणात अधिकच रस असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून भाजपासह जनता दल युनायटेडच्या स्थानिक नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे.
सध्या बिहारमध्ये भाजपा-जेडीयूच्या युतीचं सरकार असून नितीश कुमार यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढवून बिहारच्या राजकारणात किंगमेकर होण्याचे चिराग पासवान यांचे ध्येय आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वालाही त्यांचा हा संदेश लक्षात आला आहे. आघाडीतील जागावाटप झाल्यानंतर पासवान हे कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, असं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दुसरीकडे, राज्यातील सत्तारूढ पक्षातील नेत्यांनी असा दावा केलाय की, चिराग पासवान हे सध्या भाजपाच्या राज्य युनिटमधील गोंधळाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करीत आहेत.
चिराग पासवान यांची रणनीती काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या चिराग पासवान यांनी अलीकडेच सांगितले की, राज्याच्या विकासासाठी योगदान देणे हा नेहमीच त्यांचा उद्देश राहिला आहे, त्यामुळे बिहारमध्ये सक्रीय होण्यास ते तयार आहेत. त्यांच्या पक्षातील नेत्यांनी असं सूचित केलंय की, पासवान यंदा अनुसूचित जातीसाठी राखीव नसलेल्या सामान्य मतदारसंघातूनही निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे येत्या रविवारी भोजपूर जिल्ह्यातील आरा येथे होणाऱ्या त्यांच्या जाहीर सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री व जनता दल युनायटेड पक्षाचे प्रमुख नितीश कुमार यांचं राज्यातील वर्चस्व संपत आलंय, अशी भावना सध्या त्यांच्या राजकीय विरोधकांमध्ये आहे. यापार्श्वभूमीवर लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) नेते चिराग पासवान यांनी बिहारच्या राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. बिहारमधील विविध घटकांना एकत्रित आणून एनडीएचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होण्याची पासवान यांची महत्त्वाकांक्षा असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मुख्यमंत्रिबाबत त्यांच्या पक्षाकडून कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेलं नाही.

लोकसभा निवडणुकीतील ‘लोजपा’ची कामगिरी
- लोकसभा निवडणुकीत लोकजनशक्ती पार्टीने बिहारमध्ये एकूण पाच जागा लढवल्या.
- निवडणुकीतील लढविलेल्या पाचही जागांवर लोकजनशक्ती पार्टीचे उमेदवार निवडून आले.
- लोकसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पार्टीला एकूण ६.४७ मते मिळाली.
- निवडणुकीत पाच उमेदवार निवडून आल्याने चिराग पासवान यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं.
- लोकसभा निवडणुकीतील यशानंतर चिराग पासवान यांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय.
लोकसभा निवडणुकीत मिळालं होतं मोठं यश
दरम्यान लोकसभा निवडणुकीत चिराग पासवान यांच्या पार्टीला ६.४७% मतं मिळाली असली तरीही ‘लोजपा’चं अस्तित्व नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडच्या तुलनेत कमीच आहे. लोकसभा निवडणुकीत जेडीयुने १८.५२ टक्के मते मिळवली होती. भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने मान्य केलं की चिराग पासवान हे आपल्या पारंपरिक मतदारांपेक्षा राज्यातील इतर समाजाची मते सहज मिळवू शकतात. बिहारचे माजी खासदार असलेल्या या नेत्याने सांगितले, “चिराग हे फक्त ४ टक्के मताधिक्य असलेल्या पासवान समुदायाचे नेते म्हणून मर्यादित राहू इच्छित नाहीत. पासवान समुदाय हा चिराग यांच्या पाठिशीच आहे; पण त्यांना राज्यात स्वत:चा प्रभाव अधिकच वाढवायचा आहे आणि त्यानुसार ते आपल्या डावपेच रचत आहेत.”
भाजपाला बिहारमध्ये नेता घडविण्यात अपयश?
राज्यातील काही भाजपा नेत्यांनी असा आरोप केलाय की, बिहारसारख्या राजकीयदृष्ट्या निर्णायक असलेल्या राज्यात पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला स्थानिक नेता घडविण्यात अपयश आलं आहे. याच गोष्टीचा फायदा चिराग पासवान हे घेत आहेत. “राज्यात भाजपाला ठोस नेतृत्व लाभलं असतं तर, अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. चिराग पासवान याचा पूर्णपणे फायदा घेत असून ते अतिशय सावधपणे आपले पत्ते टाकत आहेत,” असं भाजपाच्या एका नेत्याने सांगितलं. “चिराग पासवान हे बिहारमध्ये स्थायिक होऊन सर्वसामान्य मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत देत आहेत, म्हणजेच ते ‘पुढचे नितीश कुमार’ होण्याची भूमिका घेत आहेत. नितीश कुमार यांनी जवळपास दोन दशकं बहुमताशिवाय आणि २०% मतवाटा नसताना देखील बिहारवर सत्ता गाजवली आहे. भाजपाला राज्यात नेते घडविण्यात अपयश आलं असून ते फक्त कार्यकर्तेच तयार करीत आहेत,” अशी टीका देखील या नेत्याने केली.
“नितीश कुमारांची बरोबरी करणं अशक्य”
भाजपाचे नेते व ‘Broken Promises: Caste, Crime and Politics in Bihar’ या पुस्तकाचे लेखक मृत्युंजय शर्मा म्हणाले, “चिराग पासवान यांचे सध्या सुरू असलेले राजकीय ‘पोस्टरिंग’ हे त्यांच्या पक्षाचा प्रभाव जातीयव्यवस्थेपलीकडे नेण्याच्या प्रयत्न आहे. असं वाटतं की चिराग हे केवळ पासवान समाजापुरतेच मर्यादित न राहता तरुण आणि महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच ते आरक्षित नसलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची भाषा करत आहेत.” पुढे बोलताना शर्मा म्हणाले की, चिराग यांच्यासाठी ही लढाई अजिबात सोपी राहणार नाही. कारण, त्यांचा पक्ष हा नितीश कुमार यांच्या ‘जेडीयू’च्या तुलनेत अजूनही लहान आहे. जनता दल युनायटेड हा कोणत्याही निवडणुकीत बिहारमध्ये २० टक्के मताधिक्य घेणारा प्रभावी पक्ष आहे. चिराग यांना स्वतःच्या पक्षाला राज्यातील निर्णायक स्थानावर पोहोचविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील आणि पुढील पाच ते १० वर्षांत हे सहज शक्य होणं कठी आहे.
बिहारमध्ये युतीशिवाय भाजपाकडे पर्यायच नाही?
२००५ मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एकसंध असलेल्या लोक जनशक्ती पार्टीने २४३ पैकी २९ जागा जिंकल्या होत्या. दरम्यान, भाजपानेही हे मान्य केलंय की, बिहारसारख्या अत्यंत महत्त्वाच्या राज्यात त्यांना फारच सावधगिरीने वाटचाल करावी लागेल. राज्यातील तीन प्रमुख पक्षांपैकी (भाजपा, जेडीयू आणि आरजेडी) कोणतेही दोन पक्ष एकत्रित आल्यास विजयाचं समीकरण सोपं होऊन सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होतो. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने स्पष्ट केलंय की, सध्या त्यांच्या हातात फार कोणतेही पर्याय शिल्लक नाहीत. त्यामुळेच मित्रपक्षांना बरोबर घेऊन नितीश कुमार यांच्या नेतृत्वातच पुढील निवडणुका लढवाव्या लागतील.
हेही वाचा : काँग्रेसचा भाजपाला छुपा पाठिंबा? लवकरच तिसरी आघाडी? माजी मुख्यमंत्र्यांनी काय आरोप केले?
‘जोपर्यंत चालेल, तोपर्यंत चालवू’
भाजपाच्या एका दिल्लीतील नेत्याने सांगितले की, नितीश कुमार यांना त्यांची तब्येत फारशी साथ देत नाही. परंतु, त्यांचा चेहरा आजही पक्षाला चांगली मते मिळवून देतो. त्यामुळे त्यांचे राजकीय वारसदार पुढे येणे गरजेचे आहे. ‘जोपर्यंत चालेल, तोपर्यंत चालवू.’ सध्या भाजपाकडे दुसरा कोणताही ठोस पर्याय नाही, असंही ते म्हणाले. दरम्यान, भाजपाला राष्ट्रीय राजकारणात आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थिती बिहारची विधानसभा निवडणूक जिंकणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने आगामी जनगणनेदरम्यान जातनिहाय गणना घेण्याची घोषणा केल्यानंतर या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण होणार?
गेल्या काही वर्षांपासून बिहारमध्ये जातीयजनगणेची मागणी केली जात होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मागील काही निवडणुकांपासून हा मुद्दा जोरकसपणे लावून धरला होता. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड आणि लोक जनशक्ती पार्टीने (रामविलास गट) जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी जातनिहाय जनगणनेची आवश्यकता आहे, असा दावा या दोन्ही पक्षांनी केला होता. जर भाजपा या सर्व मुद्द्यांवर मात करून बिहारमध्ये यश मिळवले तर त्यांचे बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे स्वप्नही पूर्ण होईल. कारण, गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाला बिहारचे मुख्यमंत्रिपद मिळविता आलेले नाही.