नागपूर : “ भारतीय जनता पक्षाच्या जात निहाय आघाड्या काढू नका, मी प्रदेशाध्यक्ष असताना ही चूक केली होती, ती तुम्ही करू नका ’ असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला. भाजप हीच कार्यकर्त्यांची जात असावी असेही गडकरी म्हणाले. सध्या जातीच्या आधारावर राजकारणाचे दिवस असताना गडकरींचा सल्ला बावनकुळे स्वीकारतील काय ? असा सवाल भाजप वर्तुळात केला जात आहे.
रामनवमीच्या महुर्तावर भारतीय जनता पक्षाच्या नागपूर शहर कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम गेल्या रविवारी पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन कार्यालयाची पायाभरणी झाली. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.या कार्यक्रमात गडकरी यांनी बावनकुळे यांना सल्ला दिला.
गडकरी हे संघाच्या मुशीतून तयार झालेले, प्रदीर्घ काळापासून राजकारणात घट्ट पाय रोवून असणाऱ्या नेत्यांपैकी एक नेते आहेत. ते २००४ ते २००९ दरम्यान महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. २००९ ते २०१३ या काळात ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा होते. केंद्रात सत्ता नसताना पक्ष सांभाळण्याचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. त्याच्या् आधारावर त्यांनी विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वरील सल्ला दिला असावा. परंतु भाजपवर उच्चवर्णीयांचा, शेटजीं, भटजींचा पक्ष असा शिक्का होता. तो पुसून काढण्यासाठी भाजपने ‘जात ’ हाच आधार घेतला. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना तेथेही ‘जात’ ग्राह्य धरली जाऊ लागली. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे यांची नियुक्ती करताना ते ओबीसी प्रवर्गातील कार्यकर्ते, नेते आहेत याला अधिक महत्व देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी दिलेला सल्ला कितपत स्वीकारार्ह आहे, असा सवाल केला जात आहे.
गडकरींना जातनिहाय आघाड्या का नको ?
जात निहाय पक्षाच्या आघाड्या स्थापन करण्याला विरोध का हे सांगताना गडकरी म्हणाले, अशा आघाड्या तयार करण्याचा हेतू हा सर्व जाती पक्षासोबत जुळाव्या हा असतो, पण निवडणुका आल्यावर आमच्या जातीला प्रतिनिधीत्व किती देणार अशी मागणी विविध जातीचे नेते करतात, वास्तविक या नेत्यांना त्यांच्या जातीत कोणीच विचारत नाही, यात कार्यकर्ता मागे राहतो, त्यामुळे कार्यकर्ता कोणत्या जातीचा आहे, त्यापेक्षा त्याची जात ही भाजप असावी, असे गडकरींना वाटते.
सध्यास्थिती काय ?
काँग्रेस प्रमाणेच भाजपमध्येही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, भटके-विमुक्त, मुस्लिम आणि अन्य जातीच्या आघाड्या आहेत. त्यांची स्वतंत्र कार्यकारिणी आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मंत्री असूनही भाजपने बावनकुळे यांना विधानसभेची तिकीट नाकारली होती. तेव्हा बावनकुळे यांनाही ओबीसींचा मुद्दा हाती घेऊन स्वत:ची ओबीसी नेता अशी प्रतिमा माध्यमांच्या मदतीने करून घेतली होती. गडकरी यांनीही त्यांच्या लोकसभा निवडणुकीत जातनिहाय नेते -कार्यकर्ते जवळ केले होते. मुस्लिम भाजपला मते देत नाही म्हणून त्यांनी या समाजाला जवळ करण्यासाठी केलेले प्रयत्न लपून राहिले नाही. फडणवीस हे सुद्धा याला अपवाद नाही. त्यामुळे राजकारणातील जात आता कोणीच वगळू शकत नाही. अगदी बावनकुळे सुद्धा. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने केलेल्या तिकीट वाटपात जात हा मुद्दा किती निर्णायक होता हे दिसन आले.