नीरज राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर: लोकसभा निवडणुकीला सव्वा वर्षाचा कालावधी असला तरीही या जागेसाठी प्रमुख दावेदार असणाऱ्या पक्षांनी या निवडणुकीच्या दृष्टीने बांधणी हाती घेतली आहे. पालघरची जागा बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांना सोडण्यास भाजप तयार नसून त्याचे पडसाद आता जाहीर कार्यक्रमात उमटू लागले आहेत. शनिवारी पालघर येथे झालेल्या अमृत महाआवाज अभियानअंतर्गत कार्यक्रमात पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शिंदे गटाला समर्थन देणारे खासदार राजेंद्र गावित यांच्याकडे केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष ही सर्व उपस्थितांमध्ये चर्चेची बाब ठरली आहे. तसेच आगामी काळात खासदारकीच्या उमेदवारीवरून उभय पक्षांमध्ये शीतयुद्ध सुरू झाल्याची नांदी असल्याचे मानले जात आहे.

पालघर जिल्हा परिषद कार्यालयात अमृत महा अवास अभियानांतर्गत पुरस्कार वितरण कार्यक्रमात सादरीकरण सुरू असताना खासदार राजेंद्र गावित यांनी सभागृहात प्रवेश घेतल्यानंतर सादरीकरण थांबवून जिल्हा परिषदेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्मितहास्य किंवा हस्तांदोलन केले नाही. तसेच त्यांनी खासदार गावित यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत अखंड दीड-दोन मिनिटांच्या स्वागतादरम्यान सादरीकरणाच्या स्क्रीनकडे पाहणेच पसंत केले. या घटनेमुळे उभयतांमधील दुरावा उपस्थितांना स्पष्टपणे जाणवला.

हेही वाचा: राहुल नार्वेकर : अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला संधी

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ॲडव्होकेट चिंतामण वनगा भाजपतर्फे निवडून आले होते. त्यांच्या अकस्मात निधनानंतर २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीपूर्वी त्यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसमधून पक्षांतर करत राजेंद्र गावित यांनी पोटनिवडणुकीत विजय संपादन केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये पालघरची जागा शिवसेनेकडे गेल्याने राजेंद्र गावित यांची उमेदवारी कायम ठेवत त्यांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवून खासदारकी पटकावली होती.

भाजपने राज्यात १६ लोकसभा जागांवर लक्ष केंद्रित करत ‘लोकसभा प्रवास योजना’ उपक्रमात पालघर लोकसभा जागेचा समावेश केला आहे. या दृष्टिकोनातून कै. विष्णु सवरा यांचे चिरंजीव डॉ. हेमंत सवरा, संतोष जनाठे यांच्यासह इतर काही उमेदवारांचा विचार सुरू आहे. त्याचबरोबर खासदारकीचे तिकीट मिळण्याच्या आशेवर बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार विलास तरे यांनी भाजपमध्ये अलीकडेच प्रवेश घेतला आहे. या पार्श्वभूमीवर खासदारकी तिकिटासाठी भाजपमध्येच आतापासून रस्सीखेच सुरू झाली आहे.बहुजन विकास आघाडीने सन २००९ मध्ये पालघर लोकसभेवर विजय संपादन केला होता. त्यानंतर झालेल्या दोन निवडणुकांमध्ये बविआला अपयश आले असले तरी या जागेवर त्यांचा दावा कायम असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा: ओम राजेनिंबाळकर, राणा जगजितसिंह पाटील यांच्यात दुसऱ्या पिढीतील राजकीय संघर्षाचा इतिहास

शिवसेनेच्या ज्या १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले होते त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा तिकीट देण्याचे आश्वस्त केल्याचे शिंदे यांचे निकटवर्तीय यांच्याकडून सांगण्यात येत आहे. या सूत्राला मान्यता असल्यास राजेंद्र गावित यांना पालघरमधून पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला समर्थन देणारे नीलेश सांबरे यांचे राजेंद्र गावित यांच्यासोबत तीव्र मतभेद असल्याने खासदार यांच्यासमोरील डोकेदुखी वाढली आहे.

हेही वाचा: कोल्हापूर दौऱ्यात राजकीय परीघ रुंदावण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न

या पार्श्वभूमीवर खासदारकी निवडणुकीला सव्वा वर्षाचा अवधी असताना भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट, कम्युनिस्ट पक्ष तसेच बहुजन विकास आघाडीमधून खासदारकीसाठी अनेक इच्छुक असल्याने निवडणुकीच्या तयारीला आरंभ झाला आहे. अशा परिस्थितीत राज्यात सत्तेमध्ये असणाऱ्या दोन्ही गटांमध्ये पालघर जिल्ह्यापुरते ‘ऑल इज नॉट वेल’ असेच संकेत मिळत असून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्यासमोर चिंतेचे ढग उभे राहिले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fight between minister ravindra chavan and mp rajendra gavit bjp shinde group over palghar mp seat loksabha mission print politics news tmb 01
First published on: 05-12-2022 at 11:08 IST