सांगली : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना सांगलीच्या दौर्‍यात लोकसभेसाठी भाजप उमेदवारांच्या हितशत्रूंचा होकार तर मिळालाच नाही, आणि आघाडीतील मित्रांनी भेटही टाळली. यामुळे भाजपला पराभूत करायचेच यापेक्षा आपलाच हट्ट कसा योग्य हे सांगण्याचा प्रयत्नही सांगलीत केविलवाणा ठरला असेच म्हणावे लागेल. आगामी विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम असल्याने पैरा करतांनाही स्थानिक राजकारणाचा विचार करूनच पाठिंब्याबातचा निर्णय घेतला जाणार हे स्पष्ट आहे.

सांगलीसाठी उध्दव ठाकरे यांनी मिरजेच्या जनसंवाद मेळाव्यात डबल महाराष्ट्र केसरी चंंद्रहार पाटील यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने उमेदवारीसाठी खर्‍या अर्थाने गांभीर्याने घेतले. तत्पुर्वी कोल्हापूरच्या बदली ही मागणी एक दबावतंत्राचा भाग असू शकतो असे समजून काहींसे काँग्रेसचे नेते गाफील राहिले. मात्र, ज्यावेळी मिरजेतील मेळाव्यात पैलवानांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून काँग्रेसचे नेते डॉ. विश्‍वजित कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील ही मंडळी विशाल पाटील यांच्यासह मुंबईत ठाण मांडून आहेत. आज-उद्या याचा निर्णय होईलच, पण पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेते ज्या आक्रमकपणे सांगलीच्या जागेवर हक्क सांगत आहेत, त्यानुसार कोणत्याही स्थितीत सांगलीत काँग्रेसची उमेदवारी ठेवायचीच ही सध्या मानसिकता दिसत आहे.

हेही वाचा…

हेही वाचा… कसे झाले वेणुगोपाल काँग्रेसमधील सत्ताकेंद्र? काँग्रेस नेत्यांच्या आऊटगोइंगला का ठरताहेत कारणीभूत?

काँग्रेसने उमेदवारीची मागणी लावून धरल्यानंतर खा. राऊत यांनी थेट सांगली गाठली असून पैलवानांच्या प्रचारासाठी रान उठविण्याबरोबरच भाजपमधील नाराज मंडळींना आपल्या बाजूला घेण्याचे प्रयत्न करून पाहिले. कवठेमहांकाळचे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या घरी जाऊन भाजपला पराभूत करण्यासाठी पर्यायाने हॅटट्रिकच्या प्रयत्नात असलेल्या संजयकाका पाटील यांना पराभूत करण्यासाठी मशाल हाती घेण्याचे आवाहन केले. अर्धा तास चर्चेस वेळ देउनही त्यांनी होकार तर दिलाच नाही, मात्र, जमिनीवर येउन वस्तुस्थिती पाहून निर्णय घेण्याचा सल्लाही दिला. जिल्ह्यात वसंतदादा गट अजूनही प्रबळ आणि प्रमुख दावेदार असल्याने शिवसेना उमेदवार प्रभावी ठरून जो भाजपला पराभूत करण्याचा मूळ उद्देश आहे त्या उद्देशापासून आपण बाजूला जात असल्याचे सुनावले. तरीही खा. राउत यांनी या ठिकाणी शिवसेनाच लढणार असे सांगत विशाल पाटील, विश्‍वजित कदम यांची समजूत काढली जाईल असे सांगितले. उमेदवारीच्या लढ्यातून शिवसेनेचा मविआमधील मार्ग सुकर व्हावा यासाठी विशाल पाटील यांना खासदारकीही देण्यााबाबत सुतोवाच करत अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा… राहुल गांधींच्या सभेतून मुस्लिम लीगचा झेंडा गायब; झेंड्याच्या वादावरून काँग्रेस पुन्हा अडचणीत येणार का?

महाविकास आघाडीचे उमेदवाराच्या प्रचाराची तयारी आणि राजकीय मोर्चेबांधणी करण्यासाठी खासदार राऊत यांच्या दौर्‍याचे नियोजन होते. दोन दिवस ते सांगली, हातकणंगले मतदार संघात तळ ठोकून राहणार आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी ते आले असताना आघाडीत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनीही या दौर्‍याकडे पाठ फिरवली. काँग्रेस उमेदवारीच्या स्पर्धेत असल्याने त्यांचे एकवेळ समजून घेता येईल, मात्र, राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनीही राउत यांच्या दौर्‍याला फारसे महत्व दिले नसल्याचे दिसून आले. यामुळे जमिनीवर शिवसेनेची उमेदवारी कितपत यशस्वी होते याबद्दल साशंकताच आहे. राजहट्ट, बालहट्ट या प्रमाणे उबाठा शिवसेनेचा उमेदवारीचा हट्ट मविआच्या एकसंघतेला काळ ठरतो की काय अशी स्थिती सांगलीत निर्माण झाली आहे.

हेही वाचा… रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांच्या विरोधात सपाने ऐन वेळी उमेदवार बदलला, नेमकं कारण काय?

सांगलीतील उमेदवारीचा घोळ कुणामुळे झाला या प्रश्‍नाला मात्र राउत यांनी हेतूपूर्वक बगल दिली. आघाडीतील जागा वाटपाच्या बैठकीत काँग्रेसच्या कोणत्या नेत्याने कोल्हापूरच्या बदली सांगलीचा प्रस्ताव मान्य केला हे सांगण्यास नकार देत असताना बंद दाराआडच्या चर्चा जाहीर करायच्या नसतात हे आवर्जून सांगितले. यामुळे काँग्रेसच्या उमेदवारीला खो घालण्यात झारीतील शुक्राचार्य कोण हे स्पष्ट झाले नसले तर मित्र पक्षाच्या नेत्याचे अद्यापही असलेले मौन बरेच सूचक ठरत आहे. आता हा लढा काँग्रेसला स्वत:च्या ताकदीवर आणि हिमतीवर लढावा लागणार आहे. जर आता नाही तर कधीच नाही अशी स्थिती काँग्रेस नेत्यांवर आली आहे. जिल्हा नेतृत्वाच्या स्पर्धेत असलेल्या या साठमारीतूनच नेतृत्व तावून सुलाखून निघेल. चार महिन्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची ताकद अबाधित राहावी यासाठीचा काँग्रेसचा मैदानात उतरण्याचा अट्टाहास कितपत यशस्वी ठरतो हे दोन दिवसातच कळेल. मात्र, स्थानिक पातळीवर काँग्रेसचे कार्यकर्ते टीम विशाल निवडणुकीच्या रणांगणावर शस्त्रे पारजून उतरली आहे. आता केवळ आदेशाचीच काय ती प्रतिक्षा आहे.