नवी मुंबई : गणेश नाईक यांच्यामुळे कधीकाळी नवी मुंबईच्या राजकीय परिघावर एकहाती अंमल राखणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कधी नव्हे इतकी दैना उडाल्याचे चित्र आता पहायला मिळत आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असणार्या बाजारपेठांमुळे नवी मुंबईत स्थायीक झालेला पुणे, जुन्नर, आंबेगाव, पश्चिम महाराष्ट्रातील एकगठ्ठा मतदार, माथाडी कामगारांच्या वस्त्यांमुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचा शहरावर राहीलेला प्रभाव आणि साडेबारा टक्के योजनेच्या अंमलबजावणीमुळे मुळ आगरी-कोळी मतदारांमध्ये असलेली आपुलकीची जाणीव यामुळे शरद पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग नवी मुंबईत नेहमीच राहीला आहे.
मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत या पक्षाला जिल्हाध्यक्षही मिळणे अवघड झाले असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष रिंगणात उतरुन जेमतेम सव्वा दोन हजार मते मिळविणाऱ्या डाॅ.मंगेश आमले या नवख्या चेहऱ्यावर आता अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गणेश नाईक यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांचा भक्कम पाठींबा आणि गणेश नाईक यांचे प्रभावी नेतृत्व यामुळे २००० ते २०१५ या काळात नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकहाती वरचष्मा राहीला. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या लाटेत बेलापूर विधानसभा मतदारसंघात नाईक यांना पराभवाचा धक्का बसला. त्यानंतरही २०१५ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत नवी मुंबई महापालिकेवर नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणली.
नरेंद्र मोदी यांचा देशभरातील वाढता प्रभाव, राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी जातीने लक्ष घालूनही नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईकांचा विजय झाला. पुढे गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करूनही शरद पवार यांच्या पक्षाचा प्रभाव शहरातील काही भागांवर कायम राहीला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर मात्र या पक्षाची नवी मुंबई महापालिका हद्दीत अक्षरश: दैना उडाल्याचे चित्र आहे.
पवारांना पोषक भूमी
नवी मुंबईत गणेश नाईक यांचे नेतृत्व हे शरद पवार यांच्या पक्षासाठी नेहमीच उजवी बाजू राहीली. असे असले तरी शहराचा सामाजिक चेहराही नेहमीच पवारांच्या पक्षासाठी पोषक राहीला. साधारणपणे २००० नंतर नवी मुंबईत एपीएमसी बाजारांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषत: जुन्नर, आंबेगाव, नारायणगाव, सांगली, सातारा, कोल्हापूर या पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पट्टयांमधून नवी मुंबईत वास्तव्यास आलेल्या नागरिकांची संख्या कमालिची वाढली.
माथाडी चळवळीच्या माध्यमातून स्वर्गीय शिवाजीराव पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासारखे राजकीय नेतृत्वही याच काळात पवारांच्या माध्यमातून आपली राजकीय मांड घट्ट करु लागले होते. शहरातील सर्वच उपनगरांमध्ये वास्तव्यास असलेला माथाडी मतदार हा पवारांना मानणारा होता. याशिवाय दि.बा.पाटील यांच्या संघर्षातून आकारास आलेली प्रकल्पग्रस्तांसाठी साडेबारा भूखंड योजनेचे शिल्पकारही शरद पवार ठरले. त्यामुळे आगरी-कोळी समाजातील जुन्या जाणत्यांमध्येही थोरल्या पवारांविषयी आस्था पहायला मिळत असे.
शरद पवार यांना मानणारा हा मतदार लक्षात घेऊनच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक यांचे माजी आमदार पुत्र संदीप यांनी भाजपशी बंड करताना पवारांची तुतारी हाती घेतली. संदीप यांनी ही निवडणुक निकराने लढवली आणि जेमतेम साडेतीनशे मतांनी त्यांचा पराभव झाला.
पवारांचा नवा जिल्हाध्यक्ष राजकीय वर्तुळात नवखा खेळाडू
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच शिवसेनेत असलेले नामदेव भगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करते झाले. त्यामुळे पवारांनी त्यांच्याकडे पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद सोपविले. पुढे राज्यात महायुतीचे सरकार आले आणि अजित पवारही भाजपच्या दिशेने गेले. अजित पवारांसोबत नामदेव भगत यांनी पक्षाला रामराम केला. या परिस्थितीत आमदार शशिकांत शिंदे यांनी नवी मुंबईतील पक्ष संघटनेत लक्ष घातले आणि माथाडी चळवळीत काम करणारे चंद्रकांत पाटील यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद सोपविले.
काँग्रेसचे जुने जाणते नेते स्वर्गीय डी.आर.पाटील यांचे लहान बंधू असलेले चंद्रकांत यांनी नुकताच पक्ष सोडला आणि त्यांनीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेमुळे शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. दरम्यान पाटील यांच्यानंतर पक्ष गेल्या काही दिवसांपासून अध्यक्षपदासाठी नव्या चेहर्याचा शोध घेत होता. नवी मुंबई शहरातील एकही प्रभावी नेता आता शरद पवार यांच्या पक्षात राहीलेला नाही.
मध्यंतरी उरण भागातील बडे प्रस्थ प्रशांत पाटील यांच्या निधनामुळे नवी मुंबई, पनवेल, उरण पट्टयात पवारांच्या बाजूने काम करणारा आक्रमक नेताही पक्षाने गमाविला. या परिस्थितीत डाॅ.मंगेश आमले या अगदीच नवख्या राजकीय व्यक्तीकडे पवारांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद सोपविण्यात आले आहे. आमले विधानसभा निवडणुकीत पवारांकडे उमेदवारी मागत होते.
मात्र संदीप यांच्या प्रवेशाने त्यांची संधी हुकल्यावर त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत त्यांना अवघे २३२१ मते मिळाली. शहरातील एका उपनगरात त्यांचा आतापर्यंत प्रभाव दिसलेला नाही. आमले मुळचे पश्चिम महाराष्ट्र आणि त्यातही पुणे जिल्ह्यातून येतात. या एकमेव निकषावर त्यांची या पदावर निवड करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगीतले.