Local body elections: महाराष्ट्रात सध्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. ही तयारी सुरू असतानाच मतदारांना चिंतेत टाकणारी एक समस्या उद्भवली आहे. या निवडणुकांमध्ये लाखो नवीन नोंदणीकृत मतदारांना मतदानाची संधी मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नागरी निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या मतदार यादीचा वापर आगामी निवडणुकांसाठी पुन्हा केला जाईल, असे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. परिणामी, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर नोंदणी केलेले सात लाखांहून अधिक नवीन मतदार वगळले जाण्याची शक्यता आहे.
यापैकी अनेक नवीन मतदारांनी (त्यापैकी बरेच जण पहिल्यांदाच मतदान करणारे तरुण मतदार होते) आगामी महानगरपालिका आणि पंचायत निवडणुकीत मतदान करण्याची आशा बाळगली होती, ज्यांच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. परंतु, कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अलीकडील विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या अंतिम मतदार यादीचा वापर करावा लागतो, नव्याने अद्ययावत यादीचा वापर करावा लागत नाही.
अनेक नवीन मतदारांनी, ज्यांनी पहिल्यांदाच मतदान केले आहे त्यांची नोंदणी २०२४ च्या विधानसभा निवडणुकांआधी झाली होती. त्या नवीन मतदारांनी आगामी महानगरपालिका आणि पंचायत निवडणुकीतही मतदान करण्याची आशा नक्कीच बाळगली असेल. कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही महिन्यांआधी पार पडलेल्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या अंतिम मतदार यादीचा वापर करावा लागतो.
विधानसभा निवडणुकांसाठी निश्चित करण्यात आलेली मतदार यादीच आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी वापरली जाण्याची शक्यता असल्याने आगामी निवडणुकांमध्ये नवमतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही, अशी परिस्थिती सध्या आहे.
राज्य निवडणूक आयोग मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मंत्रालयातील कार्यालयातून घेत असते. त्यानुसार राज्य आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेली मतदार यादी ही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे पत्राद्वारे मागितली आहे. त्याच यादीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपासून नंतरच्या काळात ज्या मतदारांची नोंदणी झालेली असेल, त्यांना मतदान करता येणार नाही.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडली. याआधी निवडणूक आयोगाने अद्ययावत मतदार यादी जाहीर केली होती. त्यानुसार राज्यात ९ कोटी ७० लाखांपेक्षाही जास्त नोंदणीकृत मतदार होते. त्यापैकी २२ लाख मतदार हे पहिल्यांदा मतदान करणारे होते. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आहेत. त्यापैकी ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष, तर ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार आहेत. याशिवाय ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार आहेत. महाराष्ट्रात १८ ते १९ वर्ष वयोगटातील एकूण २२ लाख २२ हजार ४०७ मतदार आहेत. आयोगाच्या माहितीनुसार, राज्यात सर्वाधिक मतदार ३० ते ३९ वर्ष वयोगटातील आहेत. त्यांची संख्या २ कोटी १८ लाख १५ हजार २७८ इतकी आहे. याशिवाय ८५ ते १५० वर्ष वयोगटातील १२ लाख ४० हजार ९१९ मतदार आहेत. यापैकी १२० वर्षांपेक्षा जास्त वयाचे ११० मतदार आहेत, ज्यात ५६ पुरुष, तर ५४ महिला आहेत.