Raj and Uddhav Thackrey alliance: राज ठाकरे यांच्या मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उबाठा)मधील कार्यकर्ते आणि स्थानिक नेते एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत. असं असताना या दोन्ही भावांमधील बहुचर्चित युती अद्यापही अनिश्चित आहे. राज आणि उद्धव ठाकरे दोघेही युतीच्या शक्यतांबाबत विधानं करत असूनही दोघांनीही अद्याप युतीसंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. गुरुवारी सकाळी राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे इथल्या एका हॉटेलमध्ये बंद दाराआड बैठक घेतली. नेमकं यावरूनच राज-उद्धव युतीबाबतच्या कथानकाला आता वेगळं वळण मिळालं आहे. मुंबईतील महत्त्वाच्या महापालिका निवडणुका आता जवळ येत असताना ही बैठक गेम-चेंजर म्हणून पाहिली जात आहे; तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेने (उबाठा)ला रोखण्यासाठी आखण्यात आलेली ही भाजपाची रणनीतीही असू शकते.

गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना (उबाठा) या दोन्ही पक्षांनी समेट घडवून आणण्याचे संकेत दिले आहेत. मनसे आणि शिवसेना (उबाठा) या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी अनेक व्यासपीठांवर सौहार्दपूर्ण संवाद साधताना दिसत आहेत, त्यामुळे शहरातील मराठी राजकारणाला आकार देऊ शकणाऱ्या संभाव्य युतीबाबत अटकळ निर्माण झाली आहे. फडणवीस आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या बंद दारामागील या भेटीबद्दल काहीही उघड केले नसले तरी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला भाजपा आणि महायुतीचा पाठिंबा मिळ शकतो, अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमधील मुलाखतीत राज यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले मतभेद बाजूला ठेवण्याची तयारी दर्शविली होती, तेव्हापासूनच उद्धव-राज युतीची चर्चा सुरू झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी या चर्चांना सकारात्मक संकेत दिले. दोन्ही पक्षांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी मुंबईतील अनेक भागांत बॅनर लावून या दोघा भावांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

  • राज-उद्धव युती झाल्यास…
  • राज-उद्धव एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात चमत्कार घडू शकतो
  • भाजपाच्या अडचणीत वाढ होऊ शकते
  • आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्य दृष्टीने या युतीला अधिक महत्त्व
  • महाराष्ट्र आणि मराठी माणसाची दोन्ही पक्षांना उत्तम साथ लाभू शकते

मैत्रीपूर्ण संबंध असूनही राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोणताही औपचारिक संवाद झालेला नाही. दोन्ही नेत्यांची अद्याप भेट झालेली नाही किंवा त्यांच्या संघांना युतीची चर्चा सुरू करण्याबाबत काही निर्देशही मिळालेले नाहीत, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. दोन्ही पक्ष जाणीवपूर्वक मागे हटत आहेत, राज्य निवडणूक आयोग निर्णायक पाऊल उचलण्यापूर्वी महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची वाट पाहत आहेत, असं चित्र सध्या दिसत आहे.

राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील बैठकीनंतर महायुती आणि महाविकास आघाडीतील विविध नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते रोहित पवार यांच्या मते राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी करण्याची तयारी दर्शविली आहे. शिवाय आता देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची भेट ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीची राजकीय युक्तीही असू शकते.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार याबाबत म्हणाले की, “ठाकरे बंधूंचे पुनर्मिलन भाजपाला परवडणारे नाही. मराठी माणसाला ही युती हवी आहे आणि जर कुटुंब एकत्र येणार असेल तर काँग्रेस पक्ष त्याला पाठिंबा देईलच. पण, जर राज ठाकरे महायुतीशी युतीची चर्चा करत असतील तर त्यांची विश्वासार्हता धोक्यात आहे.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने वॉर्ड रिलिमिटेशन प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होऊ शकतात असे संकेत मिळत आहेत. राज्याने पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण-डोंबिवली यांसह अ, ब आणि क श्रेणीतील महानगरपालिकांसाठी वॉर्ड पुनर्रचना करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई त्यांचे २२७ एकल-सदस्यीय वॉर्ड स्वरूप कायम ठेवेल, तर बहुतेक इतर महानगरपालिका चार-सदस्यीय वॉर्ड मॉडेलकडे वळतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वॉर्डच्या सीमा पुन्हा आखल्या जात असताना आणि निवडणुकीच्या तारखा जवळ येत असताना राज आणि उद्धव यांच्यातील युती औपचारिक करण्याचा किंवा ही कल्पना सोडून देण्याचा दबाव सर्वच पक्षातून वाढत असल्याचे दिसून येते. दोन्ही गटांच्या समर्थकांचा असा युक्तिवाद आहे की, प्रतीकात्मक कृती करण्याची वेळ संपली आहे. तसंच राजकीय पातळीवर पूर्ण स्पष्टतेची वेळ आली आहे. राज आणि उद्धव हातमिळवणी करून संयुक्त ठाकरे आघाडी सादर करतील का? की ते एकट्याने महत्त्वाची महापालिका निवडणूक लढवतील? अशी चर्चा सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणात रंगताना दिसत आहे