Supriya Sule on Indian Delegation on Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने हाती घेतलेलं ऑपरेशन सिंदूर यासंदर्भात भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पष्ट करण्यासाठी विविध पक्षांच्या सदस्यांचं शिष्टमंडळ तयार करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने कतार, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया, इजिप्तचा दौरा करुन परतल्या. या दौऱ्याबाबत त्यांनी इंडियन एक्स्प्रेससाठी लिहिलेल्या लेखाद्वारे सविस्तर माहिती दिली.
सुप्रिया सुळे यांच्या शिष्टमंडळात राजीव प्रताप रुडी (भाजपा), आनंद शर्मा (काँग्रेस), व्ही. मुरलीधरन (भाजप), मनीष तिवारी (काँग्रेस), अनुराग सिंग ठाकूर (भाजपा), विक्रमजीत सिंग साहनी (आप), लवू श्री कृष्ण देवरायलू (टीडीपी) आणि सय्यद अकबरुद्दीन (संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे माजी कायमस्वरूपी प्रतिनिधी) यांचा समावेश होता. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका आणि त्यांच्या दहशतवादी धोरणाचे पुरावे यावेळी या शिष्टमंडळाने सादर केले. दोहा येथील उपसभापती डॉ. हमदा बिंत हसन अल सुलैती आणि मंत्री डॉ. मोहम्मद बिन अब्दुलअझीझ अल खुलैफी यांच्यापासून ते कैरो येथील अरब लीगचे सरचिटणीस अहमद अबोल घैत यांनीदेखील आम्ही सादर केलेल्या पुराव्यांना योग्य प्रतिसाद दिला असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
दक्षिण आफ्रिकेत उपाध्यक्ष लेस गोव्हेंडर, पोर्टफोलिओ समितीचे अध्यक्ष सुप्रा ओबाकेंग रामोलेत्सी महुमापेलो आणि डेमोक्रॅटिक अलायन्स नेते जॉन स्टीनहुईसेन यांच्याशी झालेल्या आमच्या संवादात प्रचारापेक्षा तथ्यांप्रती असलेल्या वचनबद्धतेवर पुन्हा भर देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसंच “या दौऱ्यादरम्यान तुम्ही आमच्यासोबत ठामपणे उभे रहा, दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी आपण एकजुटीने जगासाठी एकत्र काम करू या”, ही भावना आमच्यात सातत्याने होती असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
प्रिया सुळे यांनी सांगितलं की, पाकिस्तानने कायम राज्य-पुरस्कृत दहशतवादाला एकाकी कृत्ये म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सादर केलेल्या पुराव्यांवर आधारित राजनैतिक मोहिमेने हे सुनिश्चित केले की, पाकिस्तानने बनाव रचण्याआधी प्रमुख आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रमुख देशांना आवश्यक माहिती प्रदान करण्यात आली. भारताच्या बाजूने ही सक्रिय रणनीती आंतरराष्ट्रीय समर्थन टिकवून ठेवण्यात महत्त्वाची ठरली आहे. मोहिमेची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे विनाशापेक्षा विकासावर जास्त भर दिला गेला. प्रत्येक राजधानीत नेत्यांनी संघर्षावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी व्यापार आणि तंत्रज्ञानावर वाटाघाटी करण्याचा उत्साह दाखवला असेही सुप्रिया सुळेंनी सांगितले.
प्रिया सुळे यांनी सांगितलं की, आपली भूमिका ही आक्रमक हिंसेची नसून सामंजस्याची आहे. तसंच बांधणी करण्याचा, भागीदारी वाढवण्याचा आणि मतभेदांऐवजी संवादाचा मार्ग निवडण्याचा आपला संकल्प आहे. हा दृष्टिकोन सत्तेच्या स्पर्धेत होरपळलेल्या आणि सहकार्यात्मक भागीदारीबद्दल कृतज्ञ असलेल्या राष्ट्रांना भारताकडे आकर्षित करतो. भेट दिलेल्या देशांनी भारताच्या भूमिकेला कायमस्वरुपी पाठिंबा देत असल्याचं स्पष्ट केलं. चार राष्ट्रांनी औपचारिक पाठिंबा दिला.
दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी एक समग्र दृष्टिकोन मांडला. डझनभर द्विपक्षीय सहकार्य क्षेत्रे ओळखली गेली आणि एकतेची असंख्य आश्वासनं मिळाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या मोहिमेने देशाला आणखी बळकट केले. शक्तीला विवेक, क्षमता आणि संयमाने जोडणारा देश म्हणून भारताची प्रतिमा आहे. भारत विकास, भागीदारी आणि सत्याचा पर्याय निवडतो आणि जगानेही आदर, मदत आणि एकतेने आपल्याला प्रतिसाद दिला आहे अशी माहिती सुप्रिया सुळेंनी या दौऱ्याविषयी दिली आहे.