छत्रपती संभाजीनगर : भले आमची वंचितबरोबर आता युती नाही. तरीही दलित नेतृत्व विकसित व्हावे ही इच्छा आहे. म्हणूनच अकोला लोकसभा मतदारसंघात एमआयएमने प्रकाश आंबेडकरांना जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्या या कृतीचे आता राजकीय विश्लेषण केले जात असून औरंगाबाद लोकसभेच्या मतविभाजनात ते दडले असल्याचे सांगण्यात येत आहे.

२०१९च्या निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी तीन लाख ८८ हजार ७८४ मते मिळाली होती. या मतामध्ये वंचितचा वाटा मोठा होता. गावोगावी प्रचारासाठी लागणारा खर्चही वंचितच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करून केला होता. आता औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मतविभागणी होऊ शकते असे लक्षात घेऊन ओवेसी यांनी प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा जाहीर केला.

आणखी वाचा-नवरा तुरुंगात, बायको निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत श्रीकला रेड्डी?

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात साधारणत: २२ टक्के मतदार मुस्लिम आहेत. याशिवाय अनसुचित जाती आणि जमातीतील मतदारांची टक्केवारी १९ टक्के एवढी आहे. वंचित आणि एमआयएम या दोन्हीही पक्षाच्या प्रतिमा ‘भाजपपूरक’ असल्याचे आरोप आता जाहीरपणे होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर मतांची विभागणी होऊ नये म्हणून ओवेसीने प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांना मुस्लिम मते मिळाली नाहीत, या कारणामुळे एमआयएमच्या नेत्यांवर वंचितच्या नेत्यांचा राग आहे. ‘मुस्लिम मतदान हे मुस्लिम नेत्यांच्या हातात नसून मुल्ला-मौलवींच्या हातात आहे’ असे वंचितचे नेते आवर्जून सांगत होते आणि आहेत. या राजकीय पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

आणखी वाचा-“राहुल गांधींचं हेलिकॉप्टर तपासता, मग मोदींचं का नाही?”, काय आहेत नियम…

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात २०११च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातींच्या मतदारांची जनसंख्या ७० हजार ६२६ आणि अनुसूचित जातींच्या मतदारांची संख्या तीन लाख सात हजारांच्या आसपास असल्याचा अभ्यास राजकीय पक्षांनी केलेला आहे. नव्याने या मतपेढीत भर पडली आहे. त्यामुळेच ओवेसी यांनी वंचित आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असावा, असे सांगण्यात येत आहे.

२०१९च्या निवडणुकीत एमआयएमला एकूण मतांच्या तुलनेत ३२.४५ टक्के मतदान मिळाले होते. तर तत्कालिन शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना ३२.०८ टक्के एवढे मतदान मिळाले होते. वंचितच्या मतांचा गेल्यावेळचा टक्का यावेळीही कायम राहील हे गृहीत धरून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना जाहीर पाठिंबा देण्याची खेळी ओवेसी यांनी केली आहे.