PM Narendra Modi in Bihar: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शुक्रवारी) बिहारमधील विक्रमगंज या ठिकाणाची सार्वजनिक मेळाव्यासाठी निवड केली. इथे कोट्यावधी रुपयांच्या अनेक विकासकामांचे अनावरण करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये आज ४८,५०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. यामध्ये तीन रस्ते, रेल्वे प्रकल्प आणि औरंगाबाद येथील नबीनगर औष्णिक वीज प्रकल्पाचे दोन टप्पे यांचा समावेश आहे. भाजपाचा निवडणुकीतला सर्वात मोठा निवडणुकीचा मुद्दा ठरत आहे तो म्हणजे ऑपरेशन सिंदूरचे यश. बिहारमध्ये निवडणुका तोंडावर असताना विकासकामं आणि भारताचे ऑपरेशन सिंदूर हे दोन्ही महत्त्वाचे मुद्दे ठरत आहेत. विशेष म्हणजे विक्रमगंजमध्ये २०२० आणि २०२४ च्या निवडणुकांमध्ये भाजपाला विजय मिळवता आला नव्हता.

सुरुवातीच्या मूल्यांकनानंतर असे आढळून आले की, संबंधित विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाचा आधीचा रेकॉर्ड भाजपासाठी प्रतिकूल नव्हता; तर बिहारच्या संपूर्ण मगध, शाहबाद पट्ट्यात विक्रमगंजचाही समावेश आहे. २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वाटचालीत हा पट्टा एक प्रमुख गतिरोधक ठरला होता.

गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये एनडीएला १० जागा गमवाव्या लागल्या. त्यापैकी सात जण मगध-शहाबाद या पट्ट्यातले होते. विक्रमगंज हे करकट विधानसभा मतदारसंघात येते. तिथे २०२० मध्ये भाजपा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) कडून पराभूत झाला होता. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशनचे अरुण सिंग यांनी ८२ हजार ७०० मतं मिळवली, तर भाजपाचे राजेश्वर राज यांना ६४ हजार ५११ मते मिळाली होती.

मगध-शहाबाद पट्ट्यात फक्त एकच जागा असती तर पंतप्रधानांचे लक्ष वेधण्याची गरजही लागली नसती. दरम्यान, २०२० च्या विधानसभा निवडणुकीत एनडीए उमेदवारांना शहाबाद आणि मगध भागातील जहानाबाद, पाटलीपुत्र, बक्सर आणि करकट लोकसभा मतदारसंघात एकही विधानसभा जागा जिंकता आली नाही. शहाबादमध्ये लोकसभेच्या चार जागा आहेत. अराह, सासाराम, करकट आणि बक्सर. मगधमध्ये लोकसभेच्या पाटणा, औरंगाबाद, गया, जेहानाबाद, नवादा या जागा आहेत. शहाबाद-मगध प्रदेशात ५५ विधानसभेच्या जागा आहेत, यापैकी एनडीएला फक्त १० जागा जिंकता आल्या. या १० जागांपैकी पाच जागा भाजपाने जिंकल्या, तर उर्वरित जागा मित्रपक्षांनी जिंकल्या.

पुढील निवडणुकीला फक्त पाच महिने उरले असताना भाजपाने त्यांचा प्रमुख चेहरा असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यात आणले. पाकिस्तानशी सुरू असलेल्या संघर्षाच्या आणि बिहारच्या विकासाच्या जोरावर राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. नितीश कुमार यांच्या फोटोला मागे टाकत केवळ मोदींचा चेहरा असलेले मोठे पोस्टर्स आणि ‘ना देश झुकेगा, ना बिहार का विकास रूकेगा’ अशा घोषणा प्रत्येक ठिकाणी राज्यात दिसल्या तर त्यात आश्चर्य नाही.


बिहारचे मुख्यमंत्री व जनता दल युनायटेड पक्षाचे प्रमुख नितीश कुमार हे काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींवर कठोर शब्दात टीका करीत होते. २०२० मध्ये त्यांनी बिहारची निवडणूक स्वबळावर लढवून भाजपाला राजकीय धक्काही देण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीनंतर लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाशी हातमिळवणी करून त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. मात्र, आरजेडीबरोबरचे संबंध ताणले गेल्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपाबरोबर हातमिळवणी केली. बिहारमध्ये सध्या भाजपा-जेडीयू युतीचे सरकार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर बहुमत मिळविण्यात अपयश आल्यानंतर नितीश कुमार यांचं एनडीएमधील महत्त्व आणखीच वाढलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सत्ताविरोधी लाट दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदी या पट्ट्यात विकास प्रकल्पांची घोषणा करण्यास सज्ज आहेत. मगध-शाहबाद पट्ट्याच्या मध्यभागी असलेल्या विक्रमगंज इथून त्यांनी ४८,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या योजनांचे पायाभरणी आणि उद्घाटन केले. पाटणा-गया-दोभी चार पदरी, गोपाळगंज इथे रस्ता, सासाराममधील अनुग्रह नारायण रोडपर्यंत स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग असे अनेक प्रकल्प आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून पंतप्रधान या भागातील मतदारांचा विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न करतील.