मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांनी सध्या हनुमान चालिसा आणि मशिदीवरील भोंग्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर हल्लाबोल केलाय. हनुमान चालिसा म्हणायची असेल तर स्वतःच्या घरात म्हणा. दुसऱ्याच्या दारात जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा दुराग्रह का? असा सवाल असीम सरोदे यांनी विचारला. तसेच दुसऱ्याच्या दारात हनुमान चालिसा म्हणण्यात देव नसून राजकारण आहे, असं मत व्यक्त केलं. भगतसिंग विचार मंचच्या वतीने पुण्यात सातव्या नास्तिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात असीम सरोदे बोलत होते. यावेळी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर, तुकाराम सोनवणे हे मान्यवरही उपस्थित होते.
अॅड. असीम सरोदे म्हणाले, “हनुमान चालीसा आणि भोंग्याबद्दल वाद सुरू आहे. जर हनुमान चालीसा म्हणायची, तर स्वतःच्या घरात म्हणा, हवं तर स्वतःच्या अंगणात म्हणा. दुसऱ्याच्या दारात जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा हट्ट का? त्याला राणा दाम्पत्य अन्याय आहेत असं म्हणत न्याय-अन्यायाचं स्वरुप देत आहेत. महाराष्ट्राला साडेसाती लागली आहे आणि ती दूर करण्यासाठी हनुमान चालिसा म्हटली पाहिजे, असं राणा दाम्पत्य म्हणत आहेत. मात्र, या दुराग्रहामध्ये देव नाही, तर राजकारण आहे.”

“मानसिक आधारासाठी देव मानण्याचा लोकांना हक्क”
“ज्यांना राजकारणालाच देव मानायचं असेल तर काहींनी त्यात आनंदी राहावं. मानसिक आधारासाठी देव मानण्याचा हक्क लोकांना आहे. मात्र, आज सुरू असलेल्या राजकारणातून देव संकल्पनेमुळे साधली जाणारी आत्मिक उन्नती साधली जाणार नाही,” असं असीम सरोदे यांनी सांगितलं.
“पंतप्रधान, गृहमंत्री यांना देव नाही हे नक्की माहिती आहे””
असीम सरोदे म्हणाले, “आज देवाच्या नावाने अविचाराचं दर्शन सुरू आहे. यातून गुंड बदमाशांचं राजकारण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला आपण विरोध करतो म्हणूनही काही लोकांचा नास्तिक मेळाव्याला विरोध आहे. देव ही संकल्पना अनेकांच्या राजकारणाचं भांडवल आहे. म्हणून देव नाही म्हटलं की त्या राजकारण्यांना झटका बसतो. कारण देवच राहिला नाही, तर त्यांचं राजकारणच उरणार नाही. पंतप्रधान, गृहमंत्री यांना देव नाही हे नक्की माहिती आहे.”
“दुसऱ्याच्या दारात हनुमान चालीसा म्हणण्यात देव नाही, तर राजकारण”
“दुसऱ्याच्या दारात हनुमान चालीसा म्हणण्यात देव नाही, तर राजकारण आहे,” असं म्हणत असीम सरोदे यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना टोला लगावला.

“कोणताही धर्म किंवा देव नाही हा विचारही एकप्रकारचा विश्वासच”
असीम सरोदे पुढे म्हणाले, “देवाबाबत भारतीय संविधान काय म्हणतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. १९९२ मध्ये एथिस्ट सोसायटी विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार असा एक खटला झाला होता. कोणताही देव नाही किंवा धर्म नाही असं म्हणणाऱ्या लोकांचं काही अस्तित्व आहे की नाही, महत्त्व आहे की नाही, अशा लोकांना मानवी हक्क किंवा सामाजिक हक्क आहेत की नाहीत असा प्रश्न या खटल्यातून उपस्थित करण्यात आला. तेव्हा आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सांगितलं की कोणताही धर्म किंवा देव नाही या विचारालाही एकप्रकारचा विश्वासच मानलं पाहिजे.”
“कोणताही धर्म-देव नाही हे म्हणण्याचा प्रत्येकाला हक्क”
“२०१४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात रणजीत सिंह मोहिते विरुद्ध भारत सरकार असा खटला चालला. त्यात उच्च न्यायालयाने सांगितलं, की सदसदविवेकबुद्धी विचार करण्याचं तत्व आपण मान्य केलंच पाहिजे. व्यक्तिगत स्वातंत्र्य मानताना मी कोणत्याच धर्माचा नाही किंवा कोणताही धर्म-देव नाही हे म्हणण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. कोणालाही धर्म/देव आहे हे मानण्याचं बंधनकारक करता येणार नाही,” असंही असीम सरोदे यांनी नमूद केलं.
नाव न घेता असीम सरोदे यांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंना टोला
“काहींकडून आजवर नास्तिक असल्याचं सांगितलं गेलं. आता त्यांची मुलगी म्हणते, आम्ही देवळात जातो, मग देवळात गेलेले जुने फोटो पुढे आणले जातात. निवडणुकीच्या वेळी आम्ही देवळात नारळ फोडतो, पण त्याचा गाजावाजा करत नाही असं सांगितलं जातं, ” असं म्हणत सरोदे यांनी नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना टोला लगावला.
हेही वाचा : “धार्मिक क्षेत्रातील लोकच अधिक नास्तिक”, प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांचे मत
“सरकारी कार्यालयांमधील सर्वधर्मीय पूजा बंद झाल्या पाहिजेत”
“सरकारी कार्यालयांमधील सर्वधर्मीय पूजा बंद झाल्या पाहिजेत. पोलीस सरकारी गाड्यांमध्ये जे देव देवतांचे फोटो, मुर्ती लावतात. हे सुद्धा बंद झाले पाहिजे. यासाठी जनहित याचिका दाखल करण्याची आवश्यकता आहे,” अशी भूमिकाही असीम सरोदे यांनी यावेळी मांडली.