पुणे : हवामानाबाबत जागरूक राहून संरक्षण पायाभूत सुविधानिर्मिती करण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयांतर्गत झाशी येथे देशातील पहिली भूऔष्णिक ऊर्जेवर आधारित इमारत (नेट झीरो एनर्जी बिल्डिंग) उभारण्यात आली आहे. ही नावीन्यपूर्ण इमारत चार महिन्यांत बांधण्यात आली असून, भूऔष्णिक ऊर्जेच्या वापरामुळे अंतर्गत तापमान संतुलित राहून बाह्य ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी होते.
दक्षिण मुख्यालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी या अनोख्या इमारतीचे उद्घाटन केले. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या २०२७ पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट करण्यातील महत्त्वाचे पाऊल आहे. या इमारतीमुळे दर वर्षी सुमारे ५० टन कार्बन उत्सर्जनाची भरपाई होण्याचा अंदाज आहे. कालिकत येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने या इमारतीच्या ‘नेट झीरो एनर्जी’ दर्जाची स्वतंत्रपणे तपासणी करून त्याला मान्यता दिली आहे. ही इमारतीची रचना भूपृष्ठीय ऊर्जा, सौर ऊर्जा प्रणाली, कार्यक्षम आराखडा आणि ऊर्जा व्यवस्थापनाच्या एकत्रित वापरातून वार्षिक ऊर्जा समतोल साधते. त्यामुळे ही इमारत शाश्वत संरक्षण पायाभूत सुविधांचे एक आदर्श उदाहरण ठरते, असे त्यांनी नमूद केले.
इमारतीमध्ये स्मार्ट दिव्यांची व्यवस्था, सौर ऊर्जा, ऊर्जा-कार्यक्षम यंत्रणा अशा सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इमारतीसाठी किमान वीजवापर करावा लागणार असून, वीज नसलेल्या ठिकाणीही ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. पर्यायाने दूरवर आणि सीमावर्ती भागात हरित इमारतींच्या भविष्यातील उभारणीसाठी हा प्रकल्प नवा मापदंड ठरणार आहे. तसेच लष्कराचा प्रतिकूल परिस्थिती, आत्मनिर्भरता, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधानिर्मितीवरील भर अधोरेखित होत असल्याची माहिती दक्षिण मुख्यालयाने दिली.