राज्यातील बहुतांश भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाची गती वाढणार आहे. पुढील पाच दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि कोकण (दक्षिण कोकण) या भागांत अतिवृष्टी ते मुसळधार पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात दडी मारलेल्या पावसाचे जोरदार आगमन झाले असून, तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा >>> पिंपळेसौदागरमधील रस्ता खचल्यावर महापालिकेला जाग; आता नोटिसा पाठवण्याचा फार्स
राज्यात काही अपवादवगळता सर्वदूर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विशेषत: घाटमाथा, कोकण या भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ठिकाणच्या नद्यांना पूर आला आहे. मात्र, आता या पावसाची गती आणखी वाढणार असून, विदर्भात मोसमी पाऊस अधिक सक्रिय झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिवृष्टी होणार आहे. विदर्भात जोरदार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
हेही वाचा >>> राज्यात उद्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहणार; पुणे, पालघरला ‘रेड ॲलर्ट’
दरम्यान, राज्यात पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र (काही भाग) घाटमाथा, विदर्भात मुसळधार ते अतिवृष्टी होईल.
मराठवाड्यात विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, कोकणात सोसाट्याचा वारा वाढेल आणि विदर्भातही मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
इशारा काय?
नारंगी इशारा – पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर (घाटमाथा), सातारा (घाटमाथा)
पिवळा इशारा – ठाणे, मुंबई, पुणे (घाटमाथा), हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ
…म्हणून राज्यात जोरधारा
राज्यात जोरदार पाऊस पडण्यास कमी दाबाचे क्षेत्र (मॉन्सून ट्रफ) कारणीभूत असून, शनिवारी (२२ जुलै) हे कमी दाबाचे क्षेत्र जैसलमेर, दिश, रतलाम, बीटुल, चंद्रपूर, कोंडगनगाव ते दक्षिण भागाकडून अंदमानच्या समुद्रापर्यंत सक्रिय आहे. याशिवाय दक्षिण विदर्भ ते छत्तीसगड या भागापर्यंत वाऱ्याची चक्रीय स्थिती कार्यरत आहे. त्यामुळे विदर्भात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. याशिवाय दक्षिणपूर्व मध्यप्रदेश, दक्षिण पश्चिम राजस्थान आणि ईशान्य गुजरातपर्यंत चक्रीय स्थिती कार्यरत आहे. याबरोबरच २४ जुलैला उत्तर आंध्रप्रदेश, उत्तर ओरिसा ते मध्यपूर्व बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या स्थितीमुळे पुढील पाच दिवस राज्याच्या बहुतांश भागात जोरधारा कोसळणार आहेत.