कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीच्या नेतृत्त्वात काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला. या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं ‘हिमालयात जाईन’ या वक्तव्यावर जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जाण्याबाबतचं वक्तव्य कधी-कोठे केलं होतं? चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाण्याबाबत नेमकं काय वक्तव्य केलं होतं? याचाच खास आढावा.

भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वर्षपूर्ती कार्यालय अहवालाचे प्रकाशन २ नोव्हेंबर २०२० रोजी पुण्यात झाले होते. पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. याच कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाण्याबाबतचं वक्तव्य केलं होतं.

चंद्रकांत पाटील हिमालयात जाण्याबाबत नेमकं काय म्हणाले होते?

चंद्रकांत पाटील म्हणाले होते, “जे मला म्हणतात ना कोल्हापूरमधून पळून आले. ते तिथे निवडून आले नसते. मात्र आज मी एक चॅलेंज देतो की, कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल. जर निवडून नाही आलो, तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन.”

“…तेव्हा अमित शाहांनी मला विधानसभा निवडणूक लढवण्यास सांगितलं”

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेचाही तपशील दिला होता. ते म्हणाले होते, “मागील वर्षी विधानसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हा मला अमित शाह यांनी सांगितले की, ‘आपको विधानसभा निवडणूक लढनीं पडेगी’. यावर मी सांगितलं की, अमितभाई माझा अजून विधान परिषदेचा एक महिना शिल्लक आहे मला कुठे यात अडकून ठेवता? मी जर मोकळा राहिलो तर महाराष्ट्रभर फिरेन असं त्यांना सांगितले. आपण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाचे जास्त जागा निवडून आणू.”

“कोणी कितीही आरोप प्रत्यारोप केले, तरी…”

“मात्र, अमितभाईंनी आग्रह धरला. तुला विधानसभा लढवायची असून ‘आपको पुना मैं कोथरूडसे लढना है’ असंही सांगितलं. तसेच त्यानंतर माझ्या नावाची या मतदारसंघातून घोषणा झाली. त्यानंतर आजवर माझ्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. मला मिळालेल्या शिकवणीनुसार कोणी कितीही आरोप प्रत्यारोप केले, तरी आपण आपले काम करीत रहायचे. तेच मी आजवर करीत आलो आहे,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं.

हेही वाचा : “दादा हिमालयात जाणार असतील तर मीही…”, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचा खोचक टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रकात पाटील पुढे म्हणाले होते, “या विधानसभा मतदारसंघाचा आमदार होऊन वर्ष झाले. या दरम्यानच्या काळात अनेक व्यक्तींनी सहकार्य केले आहे. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. या पुढील काळात अनेक उपक्रम राबविणार आहे. तसेच मतदारसंघ आणि पुणे शहराच्या समस्या सोडविण्यासाठी कायम तत्पर राहणार आहे.”