पुणे : ‘समर्थ रामदास यांनी देशभर स्थापन केलेले मठ तंत्रज्ञानाने जोडावेत. इंग्रजी, हिंदीतही त्यांची माहिती उपलब्ध करून द्यावी. त्यातून चांगले वातावरण निर्माण होईल,’ असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले. तसेच, ‘समर्थसृष्टीच्या निर्मितीसाठीचा प्रस्ताव तयार करून दिल्यास तो मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्यात येईल,’ असे आश्वासनही त्यांनी दिले.
श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगडच्या श्रीमत् ग्रंथराज दासबोध अध्ययन यांच्यातर्फे डोंगरे महाराज लिखित तत्त्वार्थ रामायण या ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झाले. त्यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. ज्येष्ठ कीर्तनकार चैतन्य महाराज देगलूरकर, श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगडचे कार्याध्यक्ष अच्युत गोडबोले, कार्यवाह योगेशबुवा रामदासी, सुहास क्षीरसागर, अक्षय महाराज भोसले या वेळी उपस्थित होते. ‘‘शिवसृष्टी’च्या धर्तीवर ‘समर्थसृष्टी’ निर्माण झाली पाहिजे,’ अशी मागणी क्षीरसागर केली.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘महायुतीचे सरकार असल्याने नाशिक कुंभमेळ्याची व्यवस्था केली जात आहे, देवस्थानांना मदत केली जात आहे. समर्थसृष्टी समाज जोडण्यासाठी असावी. सर्किट निर्मितीसाठी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई काम करतील. दासबोधाच्या प्रचार प्रसारासाठी शासन सर्वतोपरी काम करील.’
‘सर्व गुणमूल्यांचे एकत्रित सार रामायणात असल्याने ते सर्वव्यापी आहे. रामचंद्र प्रभू हे केवल ब्रह्म आहेत. अभिमानाचा परिणाम अहंकारात होऊ नये याची काळजी घेतल्यावर सर्व पंथ एकत्र चालतील. सर्वाघटी राम जाणवणे ही सर्वोच्च अवस्था होय. यात स्वच्या ठिकाणी राम दिसायला लागणे, ही अनुभूती त्या पुढील टप्पा आहे,’ असे देगलूरकर यांनी सांगितले.