पुणे : गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतील एक कोटी ४२ लाख रुपयांचा निधी नियमबाह्य पद्धतीने वळविण्यात आल्याच्या आरोपावरून येरवडा कारागृहात असलेले भारत सेवक समाज संस्थेचे सचिव मिलिंद देशमुख यांनी जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

‘नागपूर येथील संस्थेची भाडेतत्त्वावरील जमीन ‘फ्री होल्ड’ करण्यासाठी ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’ला एक कोटी दोन लाख रुपये देण्याचा ठराव गोखले संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवानगीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही रक्कम वापरण्यात आली. तसेच, चाळीस लाख रुपये हे सोसायटीच्या खात्यात प्रक्रियेच्या पूर्ततेसाठी जमा करण्यात आले होते. ही रक्कम आपल्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली नाही, तसेच अपहार केला नाही.

सोसायटीचे लेखापरीक्षण अहवाल धर्मादाय आयुक्त कार्यालयाने मंजूर केले आहेत. त्यामुळे देशमुख यांच्याविरुद्ध फसवणूक, विश्वासघात अशी कलमे लागू होत नाहीत,’ असा युक्तिवाद मिलिंद देशमुख यांच्या वकील ॲड. उज्ज्वला पवार यांनी केला. देशमुख यांनी जामिन मिळविण्यासाठी केलेल्या अर्जावर सरकार पक्षाकडून म्हणणे मांडण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकार पक्षाच्या युक्तिवादानंतर देशमुख यांच्या जामीन अर्जावर निर्णय होणार आहे. देशमुख यांना २५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार देशमुख यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.