पुणे : दिवाळीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस, रेल्वे आणि विमान प्रवासासाठी शनिवारी गर्दी झाली. शिवाजीनगर, स्वारगेट आणि पुणे रेल्वे स्थानकांवर तर प्रवाशांची झुंबड उडाली. वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या.

मध्य रेल्वेने २८ विशेष गाड्यांद्वारे ९०० अधिक फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौ, दिल्ली, दानापूर, गोरखपूर, नागपूर, लातूर, रत्नागिरी, अजनी आदी ठिकाणी गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. पुणे रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी व्हावी, यासाठी काही गाड्या हडपसर आणि खडकी टर्मिनल येथून सोडण्याचे नियोजन केले आहे.

‘एसटी’महामंडळाकडून दैनंदिन गाड्यांव्यतिरिक्त ५८९ जादा गाड्या शिवाजीनगर, स्वारगेट आणि पिंपरी चिंचवड स्थानाकातून सोडण्याचे नियोजन करण्यात आले. बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी यांसह सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशीव, जळगाव, नाशिक, धुळे, नागपूर, अमरावती, सातारा, कोल्हापूर, महाबळेश्वर या जिल्ह्यांच्या मार्गांवर गाड्यांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. रेल्वे आणि एसटीशिवाय विमान प्रवासाचाही पर्याय अनेकांनी निवडला आहे. विमान कंपन्यांनी तिकिटांचे दर दुप्पट केले आहेत, तरीही प्रवाशांची मागणी कायम आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाकडून जादा गाड्या सोडल्याने आणि खासगी प्रवासी बस कंपन्यांनीही बसची संख्या वाढविल्याने शनिवारी महामार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या. पुणे-मुंबई द्रूतगती मार्ग, मुंबई-बंगळुरू महामार्गावरील खेड-शिवापूर, सातारा रस्ता, पुणे-सोलापूर महामार्गावर उरूळीकांचन, लोणी, पुणे-अहिल्यानगर मार्गावर येरवडा, खराडी, वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव या मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.

प्रवासी सेवा देणाऱ्या खासगी बस कंपन्यांनी ठरवून दिलेल्या दरानुसार तिकीट दर आकारावे. जास्त रक्कमेची मागणी केली गेल्यास संबंधित प्रवाशांनी ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा rto.12-mh@gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. तसेच तिकीटाचे छायाचित्र पाठवावे. – स्वप्निल भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे