पुणे : ‘शहरात घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, अपुरा पाणीपुरवठा, रस्त्यांची झालेली दुरवस्था अशा अनेक समस्या असून, त्या सुटत नाहीत. त्यामुळे पुणेकरांचे जीवन बिकट झाले आहे,’ अशा शब्दांत राज्यसभेच्या सदस्य खासदार मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त करून प्रशासनाला धारेवर धरले. वर्षानुवर्षे पायाभूत सुविधांची वानवा भेडसावत असल्याचे स्पष्ट करून, ‘पुणेकरांनी जो विश्वास टाकला आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न मांडत आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार मेधा कुलकर्णी यांनी शुक्रवारी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन चर्चा केली. सुमारे एक तास ही बैठक चालली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आयुक्तांबरोबर झालेल्या विविध विषयांवरील चर्चेची माहिती खासदार कुलकर्णी यांनी दिली.

त्या म्हणाल्या, ‘वाहतुकीची कोंडी हा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अरुंद रस्ते, वाढणारी वाहने, रस्ते तयार करताना पथ विभागाचे चुकलेले नियोजन, कामाकडे महापालिकेतील अधिकाऱ्यांचे होणारे दुर्लक्ष यामुळे परिस्थिती बिकट होत असून, नागरिकांच्या जीवनावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. चौकाचौकांत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य पुणेकर त्रस्त झाला असून, पुण्यातून मुंबईला पोहोचण्यासाठी जेवढा वेळ लागतो, त्यापेक्षा अधिक वेळ शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी लागत आहे.’

‘रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढत असून, महापालिका प्रशासन त्याकडे ढिम्मपणे पाहत आहे. अपुरा पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी वाहिन्या, बेकायदा पद्धतीने होणारी वृक्षतोड याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. शहरातील अनेक भागांत सर्रासपणे बेकायदा बांधकामे केली जात असून, त्यासाठी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. गुलटेकडी, मार्केटयार्ड येथील गंगाधाम चौकात अपघातांचे प्रमाण वाढत असून त्यावर आवश्यक त्या उपाययोजना का केल्या जात नाहीत. या चौकातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी येथे काही वर्षांपूर्वी उड्डाणपूल उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. या ठिकाणी उड्डाणपूल होऊ न देण्यास अडचण करणारे ‘झारीतील शुक्राचार्य’ कोण, याची माहिती प्रशासनाने जाहीर करावी,’ असे कुलकर्णी म्हणाल्या.

‘पर्यावरणाचा ऱ्हास करून ‘नदीसुधार’ नको’

‘नदीचे सौंदर्य वाढविण्यासाठी मुळा-मुठा नदीपात्र सुधार योजना हाती घेण्यात आली आहे. यासाठी केंद्र सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला असला, तरी ही योजना महापालिकेची आहे. हा प्रकल्प करताना नियमांचे उल्लंघन केले जात आहे. नदीचे पात्र कमी करून तेथे क्राँक्रिटीकरण करण्यात आले आहे. हा प्रकल्प उभारताना अनेक जुनी झाडे, दुर्मीळ वनस्पती यांसह नैसर्गिक अधिवास नष्ट होईल, असे काम केले जात असून, लोकप्रतिनिधी म्हणून याला विरोध आहे. पर्यावरणाची हानी होईल आणि पुणेकरांच्या निधीचा चुराडा होईल, अशा प्रत्येक गोष्टीला विरोध राहणार आहे,’ असे मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘टीका करतानाही मर्यादा ठेवणे गरजेचे’

पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याच्या मागणीवरून सुरू असलेले राजकारण गलिच्छ असल्याची टीकाही मेधा कुलकर्णी यांनी केली. ‘लोकशाही आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला मत मांडायचा अधिकार आहे. बाजीराव पेशवे यांचे नाव भूषणावह असून, ते नाव द्यावे, असे मत मी मांडले. राजकारण करताना टीका होऊ शकते. मात्र, ही टीका करतानाही मर्यादा ठेवणे गरजेचे आहे. खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली.