पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ५ जूनपर्यंत अर्ज करता येणार असून, अल्पसंख्याक आणि ‘इनहाऊस’ कोट्याच्या प्रवेशाबाबतही सुधारित कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे.
राज्यात यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. त्यानुसार मंगळवारपर्यंत राज्यभरातील १० लाख ८५ हजार ८५१ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. तसेच, अल्पसंख्याक आणि इनहाऊस कोट्यातील प्रवेशांबाबत केलेल्या बदलानुसार शैक्षणिक संस्था, विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास मुदत देणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अल्पसंख्याक उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांना अल्पसंख्याक कोटा ५० टक्के असेल. या कोट्यामधील जागा शाळा व्यवस्थापनास सर्वसाधारण नियमित ३ फेऱ्या संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरण्याची मुभा असेल. मात्र, अल्पसंख्याक कोट्यातील जागा पहिल्या फेरीअंती रिक्त राहिल्यास पहिल्या फेरीनंतर अल्पसंख्याक दर्जा प्राप्त कनिष्ठ महविद्यालयांना उर्वरित जागा प्रत्यार्पित करण्याची मुभा असेल. तर दुसऱ्या फेरीवेळी व अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेशासाठी अर्ज प्राप्त झाल्यास त्या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश अल्पसंख्याक कोट्यातून देण्यात येतील, त्यानंतर रिक्त असलेल्या अल्पसंख्याक कोट्यातील जागा सर्वसाधारणमध्ये प्रत्यार्पित करण्याची मुभा महाविद्यालयांना असेल. उर्वरित जागा प्रत्यार्पित करणे पूर्णतः ऐच्छिक असून, कोणत्याही अल्पसंख्याक संस्थेवर बंधनकारक नसेल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
इनहाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित असतील. या कोट्याअंतर्गत भरण्यात येणाऱ्या जागा गुणवत्तेनुसार ऑनलाइन पद्धतीने भराव्यात. उच्च माध्यमिक शाळा असलेल्या परिसरात, आवारात माध्यमिक शाळा असल्यास या माध्यमिक शाळेतील उमेदवारांना हा कोटा लागू असेल. बिगर अल्पसंख्याक व अल्पसंख्याक शाळांना इनहाऊस कोटा लागू असेल. सर्वसाधारण नियमित दुसरी फेरी संपेपर्यंत या कोट्यातील जागा भरता येतील. तद्नंतर सदर जागा रिक्त असल्यास प्रत्यार्पित करणे व्यवस्थापनास अनिवार्य असेल.
राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इन-हाऊस कोटा ५० टक्के असेल. या कोट्याकरिता इयत्ता दहावीची परीक्षा राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पात्र असतील. तसेच मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे येथे उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळांसाठी एक युनिट ग्राह्य धरणे योग्य राहील. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांकरिता त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसुली जिल्ह्यामध्ये एक युनिट इन-हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरणे योग्य राहील, असे नमूद करण्यात आले आहे.