दौंडमधील भीमानदीपात्रात सापडलेल्या सात मृतदेहापैकी तीन मृतदेहांचे पोलिसांकडून पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. सामूहिक हत्याकांड प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पुन्हा तीन मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

हेही वाचा- पुणे: श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दौंडमधील परिसरात मजुरी करणाऱ्या एकाच कुटुंबातील सात जणांचे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. चुलतभावाने सात जणांचे खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली आहे.
मोहन उत्तम पवार (वय ४५), संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघे रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), राणी शाम फलवरे (वय २४), शाम पंडीत फलवरे (वय २८), रितेश उर्फ भैय्या शाम फलवरे (वय ७), छोटू शाम फलवरे (वय ५), कृष्णा शाम फलवरे (वय ३, सर्व रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अशोक कल्याण पवार (वय ३९), शाम कल्याण पवार (वय ३५), शंकर कल्याण पवार (वय ३७), प्रकाश कल्याण पवार (वय २४), कांताबाई सर्जेराव जाधव (वय ४५, सर्व रा. ढवळे मळा, निघोज, ता. पारनेर, जि. नगर) यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा- पुणे: नांदण्यास नकार दिल्याने ‘एचआयव्ही’बाधित पतीकडून पत्नीवर चाकू हल्ला; बिबवेवाडी भागातील घटना

पोलिसांनी नातेवाईकांच्या उपस्थितीत सात मृतदेहांचे यवत परिसरात मुठा कालव्याजवळ दफन केले. तीन जणांचे शवविच्छेदन यवत येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आले होते. उर्वरित चौघांचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात करण्यात आले. यवत येथील शासकीय रुग्णालयाने तिघांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद केले होते. त्यानंतर तीन मृतदेहांचे पुन्हा शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ससून रुग्णालायातील वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक, दौंडचे तहसीलदार संजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा- पुणे: विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मोबाइलवर ध्वनिचित्रफीत, छायाचित्र काढून मुलीला धमकावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाण्यात सापडलेले मृतदेह सडलेले होते. त्यामुळे शवविच्छेदनात त्यांचा व्हिसेरा राखता आला नाही. सात जणांचा खून नेमका कसा झाला. त्यांचा खून करुन पाण्यात टाकून दिले का? याबाबतचा सखोल तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.