पुणे : ‘एके काळी माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व, तसेच आपला देश हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे होते. सध्या आपले पाकिस्तान, चीन, बांगलादेश आणि श्रीलंकेसोबत संबंध चांगले नाहीत. बांगलादेशासाठी भारताने त्याग केला, तो देशही आपल्यासोबत नाही. देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी सुसंवादाची परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण न केल्याने देश त्याचे परिणाम भोगत आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) २६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात पवार यांनी ही टीका केली. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

‘देशात एक काळ असा होता, की जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी ओळखले जात होते. मात्र, आजच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तान आणि चीन यांच्याबरोबर देशाचे संबंध चांगले नाहीत. बांगलादेशासाठी भारताना त्याग गेला. तो देशही आपल्यासोबत नाही. श्रीलंकेबरोबर मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असे वाटत नाही. देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी जाणीवपूर्वक सुसंवादाची परिस्थिती निर्माण केली नाही. त्याचे परिणाम देशाला भोगावे लागत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह देशातील डावे आणि अन्य पक्षांना एकत्र घेऊन दिल्लीत सुसंवाद निर्माण केला पाहिजे,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘राष्ट्रहिताच्या वेळी राजकारण नाही’

‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात येईल. महिला संधी दिली, की कर्तृत्व दाखवितात. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सैन्यातील महिलांनी केलेल्या कामगिरीचा देशाला अभिमान आहे,’ असे सांगून पवार म्हणाले, ‘राष्ट्रहिताचा प्रश्न येतो, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही राजकारण केले नाही. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हीच भूमिका घेऊन सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आणि समर्थन दिले.’