पुणे : राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांत डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. ‘महाऊर्जा’च्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे, खासदार मेधा कुलकर्णी, श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, भीमराव तापकीर, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, ‘महाऊर्जा’च्या महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडे, महाराष्ट्र राज्य वीज कंपनीचे संचालक विश्वास पाठक, ऊर्जा दक्षता ब्यूरोचे सचिव मिलिंद देवरे, अतिरिक्त महासंचालक डॉ. त्रिगुण कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘महाऊर्जासाठी येत्या काळात दोन उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत. त्याअंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्याला गती द्यावी लागेल. प्रधानमंत्री सूर्य घर योजना यशस्वी योजना असून, त्या योजनेशी संलग्न असलेली राज्याची योजना सुरू करून पहिल्या टप्प्यात १०० युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक आणि दुसऱ्या टप्प्यात ३०० युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक सौरऊर्जेवर आणायचे आहेत. ३०० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांचे विजेचे देयक शून्यावर यावे, असा प्रयत्न करण्यात येत आहे.

’ फडणवीस म्हणाले, ‘ऊर्जा बचत आणि अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात राज्याची चांगली कामगिरी आहे. गेल्या दोन वर्षांत देशभरात ४ लाख कृषी पंप बसविण्यात आले, तर राज्याने अपारंपरिक ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देऊन ५ लाख सौर कृषिपंप बसविले आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून १६ हजार मेगावॉट क्षमतेचे फीडर २०२६पर्यंत सौर ऊर्जेवर परिवर्तित करण्यात येणार आहेत. विभाजित पद्धतीने असलेला आशियातील हा सर्वांत मोठा प्रकल्प आहे. सौर, पवन आणि हायड्रोजन क्षेत्रातही राज्याने भरारी घेतली आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.