पुणे : जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये विजेचा लपंडाव सुरू असल्याने उद्योगांच्या अडचणी वाढल्या आहेत. याचा परिणाम उद्योगांच्या उत्पादकतेवर होत असून, त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर चाकणमधील उद्योजक आणि पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योजकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन त्यांच्यासमोर समस्या मांडल्या. वीज प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे.

चाकण औद्योगिक क्षेत्रात जागतिक पातळीवरील कंपन्यांसह देशातील अनेक मोठ्या कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प आहेत. चाकण परिसरात मागील काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. याचबरोबर विजेचा दाबही कमी-जास्त होत आहे. त्यामुळे उद्योगांच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहे. उत्पादन प्रकल्पातील यंत्रे ही महागडी असतात. वारंवार वीज जात असल्याने ही यंत्रे बंद पडत असून, त्यांच्या देखभालीचा खर्च वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ‘फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज’ने नुकतीच महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी उद्योजकांनी त्यांच्या समस्यांचा पाढा वाचला. देखभाल आणि दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित करताना उद्योगांना पूर्वसूचना दिली जात नाही, असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेने महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील भोसरी विभागात मे महिन्यापासून वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याचा मोठा परिणाम उद्योगांवर झाला आहे. एखाद्या बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्यासाठी ४ ते ५ तास वेळ लागत असल्याचा मुद्दा उद्योजकांनी उपस्थित केला. महावितरणने मनुष्यबळ वाढवून तातडीने या समस्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महावितरणकडून ४५ कोटींची कामे

‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये एमआयडीसी विद्युत सुधारणा योजनेअंतर्गत महावितरणकडून ४४ कोटी ७० लाख रुपयांच्या वीजयंत्रणेची उभारणी आणि सक्षमीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये चाकण औद्योगिक क्षेत्रात १५ कोटी ४९ लाख रुपये खर्चाचे तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील रामटेकडी, आकुर्डी, भोसरी, तळवडे व हिंजवडीमध्ये एकूण २९ कोटी २१ लाख रुपये खर्चाची कामे पूर्ण झाली आहेत. चाकण औद्योगिक क्षेत्रात ३ नवीन स्विचिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसेच, अतिभारित ११ वीजवाहिन्यांचे विलगीकरण करण्याचे काम सुरू आहे. त्याचा चाकण औद्योगिक क्षेत्राला फायदा होणार आहे,’ अशी माहिती महावितरणच्या पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी दिली.

वीजपुरवठा वारंवार खंडित होणे, विजेचा दाब कमी-जास्त होणे, अशा समस्या उद्योगांना भेडसावत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटूनही या समस्या सोडविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे. या समस्या सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलावीत.- दिलीप बटवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लघुउद्योगांना विजेची समस्या या उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. विजेच्या समस्या सोडविण्यासाठी महावितरणकडून जास्त वेळ घेतला जात आहे. यामुळे लघुउद्योजकांना मोठा फटका बसत आहे. महावितरणने या समस्यांचे वेळेत निराकरण करावे.- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना