शेजारचं छायाचित्र बघा, तुम्हाला दिल्लीत मुखर्जी नगरमध्ये ‘यूपीएससी’च्या शिकवण्या सुरू असल्याचा भास होऊ शकतो! या परिसरात अनेक कोचिंग क्लासेस चालतात, वर्ग भरगच्च असतात, विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत जायचं असतं, ते शिक्षक सांगतात तशा नोट्स काढून ठेवतात. त्याच नोट्सच्या आधारे पाठांतर करतात, परीक्षेत या नोट्सचा आधार घेतात, त्याचा संदर्भ घेऊन त्यांचा अभ्यास सुरू असतो. या छायाचित्रात फरक इतकाच आहे की, इथे शिक्षक आहेत पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कोचिंग क्लासला आले आहेत ते त्यांचे मंत्री. त्यातील काही मंत्री मोदींच्या कोचिंग क्लासेसना वारंवार येतात, त्यामुळे मोदी काय बोलणार हे त्यांना बहुधा तोंडपाठ आहे, असं त्यांच्या चेहऱ्यावरून तरी दिसतंय. बाकीच्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा क्लासला आल्याचे भाव आहेत. ते इमाने-इतबारे मोदींचे पाठ वह्यांवर उतरवून घेत आहेत. या शिकवणीचे शिक्षक कडक असल्यानं विद्यार्थ्यांना नोट्स काढून ठेवाव्याच लागतात. त्यांनी शिकवलेल्या अभ्यासक्रमाच्या बाहेर कोणी जाहीर विधान केलं तर त्यांच्याकडं शिक्षकाचं लक्ष जातं. मोदींची आपल्या मंत्रिमंडळावरची बारीक नजर कधी हटत नाही. पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात एका केंद्रीय मंत्र्याने फाइल अडवून ठेवली होती. हा मंत्री घटक पक्षातील होता. त्याच्या या कृतीची तक्रार अर्थ मंत्रालयाने मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी करून ठेवली होती. बैठक सुरू झाली, मास्तरांनी फाइलचा विषय काढला. ते म्हणाले की, माझ्या मंत्रिमंडळातल्या कोणी फाइल अडवलेली योग्य ठरणार नाही. सगळ्या फायली तातडीने हातावेगळ्या झाल्या पाहिजे. मास्तरांनी मंत्र्याचं नाव न घेता आदेश देऊन टाकला… ‘मोदी २.०’ वा ‘मोदी ३.०’मध्ये मंत्रिमंडळात फाइल अडवण्याची ताकद कुठल्याही घटक पक्षाच्या मंत्र्यामध्ये असेल असं दिसत नाही. उलट, जमेल तेवढा उपदेश ओंजळीत साठवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. निदान हे छायाचित्र तरी त्याचे संकेत देते! उद्या म्हणजे ९ जून ‘मोदी ३.०’ सरकारची वर्षपूर्ती होणार असल्यानं गेल्या आठवड्यात मोदींनी मंत्रिपरिषदेची बैठक बोलावली होती. पहलगाममधील हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर बोलावलेली ही पहिलीच मंत्रिपरिषद होती. या बैठकीमागं दोन उद्देश होते. वर्षपूर्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मोदी सरकार कथितरीत्या कसं यशस्वी झालं हेही लोकांना सांगायचं. त्या दृष्टीने ‘एनडीए’तल्या नेत्यांसाठी रूपरेषा आखून दिली असावी, असं त्यांच्या लिखापढीवरून तरी दिसतंय. हे छायाचित्र पाहून अनेक वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांच्या मंत्र्यांचं प्रसिद्ध छायाचित्रकार रघू राय यांनी काढलेलं छायाचित्र नजरेसमोर येऊ शकेल. इंदिरा गांधी खुर्चीवर बसल्या आहेत आणि त्यांच्या समोर गांधी टोपी घातलेले तमाम मंत्री मान खाली घालून उभे आहेत, असं ते छायाचित्र. इंदिरा गांधींच्या अधिकारवादी राजकारणाचं प्रतिबिंब त्या छायाचित्रात होतं. या छायाचित्रातही त्याच अधिकारवादाची जणू झलक पाहायला मिळाली असं कोणी म्हणू शकेल.
यादव त्यांचेच!
दिल्लीबाहेरून आलेल्या भाजपच्या नेत्यांना राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता फार असते. भेटल्या-भेटल्या ते हाच प्रश्न विचारत असतात. मध्यंतरी भूपेंद्र यादव यांचं नाव घेतलं जात होतं. पण, मध्य प्रदेशात मोहन यादव मुख्यमंत्री असताना दुसऱ्या यादवांना इतकी मोठी संधी मिळण्याची शक्यता कमीच. शिवाय, यादव समाज प्रामुख्याने लालूप्रसाद यादव आणि अखिलेश यादव यांचा असल्यानं कितीही प्रयत्न केला तरी भाजपकडे यादव फारसे वळणार नाहीत असं मानलं जातं. मग, दुसरा यादव कशाला हवा असाही विचार केला जात आहे, असं म्हणतात. अचानक महाराष्ट्रातील एका माजी प्रदेशाध्यक्षाचं नाव चर्चेत आलं. हे माजी प्रदेशाध्यक्ष काय बोलतील याचा नेम नाही. नड्डांनी काहीबाही बोलून आधीच अडचण करून ठेवलीय मग, कोण कशाला पायावर दगड मारून घेईल. आणखी एक चर्चा अशी होती की, संघ भाजपला आपला माणूस देणं बंद करेल. आता संघटन महासचिव म्हणून बी. एल. संतोष काम पाहतात. पण, हे पद काढून टाकलं जाईल. भाजपवरील ताबा संघ सोडण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाजपमध्ये मोदी पंतप्रधान असेपर्यंत तरी इतका प्रचंड बदल होऊ शकत नाही. समजा संघाच्या आवडीचा नेता राष्ट्रीय अध्यक्ष बनू शकला नाही तर संघटन महासचिवपदी संघाचा एखादा हुकमी एक्का आणला जाऊ शकतो असं म्हणतात. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचं घोंगडं जोपर्यंत भिजत पडलंय तोपर्यंत अशा सगळ्या चर्चा होत राहतील हे खरं.
‘जी७’मध्ये ‘जी हुजुरी’?
अलीकडे बातम्यांची पेरणी करण्यासाठी एक ट्वीट पुरेसं असतं. समाजमाध्यमांतून वा मुख्यधारेतल्या प्रसारमाध्यमांतल्या कोणत्या वरिष्ठांनी संबंधित ट्वीट केलंय हे समजलं की, बातमीची पेरणी कुठून झाली असावी याचा सर्वसाधारण अंदाज येऊ शकतो. गेल्या आठवड्यात अशीच एक मस्त पेरणी केली गेली. बातमी ट्वीट केली गेली की, पंतप्रधान मोदी ‘जी-७’च्या कॅनडामधील परिषदेला जाणार नाहीत… या ट्वीटमधला मथितार्थ असा होता की, भारत ‘जी-७’ देशांना जुमानत नाही. या ‘जी-७’ देशांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ प्रकरणामध्ये पाकिस्तानची बाजू घेतली होती. आता मोदी या परिषदेला गैरहजर राहून त्यांना धडा शिकवण्याचं मोठं जागतिक राजकारण करत आहेत!… अशी ट्वीट्स अनेकांनी केली. त्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. पण, या ट्वीटमध्ये मोदींना ‘जी-७’च्या परिषदेसाठी आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं, ही कळीची माहिती दिलेली नव्हती. ही ट्वीट प्रसिद्ध झाल्यावरदेखील केंद्र सरकारकडून काहीही स्पष्टीकरण दिलं गेलं नाही. कारण हे वृत्त केंद्राकडूनच दिलं गेलेलं होतं हे उघडच होतं. मग, केंद्र सरकार आमंत्रण नाही असं कशाला सांगेल? पण, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या काही भारतविषयक ‘अभ्यासकां’नी मोदींना बोलावलेलं नाही, असं खरं-खरं सांगून टाकलं. जे लपवण्याचा प्रयत्न करून मोदींच्या मुत्सद्देगिरीची ‘वाह-वाह’ चालली होती, त्यातील हवा निघून गेली. मग, एक वृत्त आलं की, आमंत्रण दिलेलं नाही पण, अखेरच्या क्षणी बोलावलं तर मोदींना कॅनडाला जाणं शक्य होणार नाही… म्हणजे मोदींना ‘जी-७’च्या परिषदेला जायचं तर होतं पण, आमंत्रण नसल्यानं अडचण झाली होती. त्यात मोदींनी न जाण्याचा निर्णय घेऊन स्वाभिमान वगैरे दाखवल्याचं सांगितलं जात होतं. अखेर एकदाचं कॅनडानं निमंत्रण पाठवलं. ते मिळता क्षणी मोदींनी ट्वीट केलं की, मी जाणार!… हा गुडघ्याला बाशिंग लावून बसल्याचा प्रकार तर नव्हे? स्वाभिमानाचं काय झालं माहीत नाही. पण, त्यापुढचं वृत्त आलं की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून कॅनडानं मोदींना आमंत्रण देण्याचा निर्णय घेतला. हे ट्रम्प महाशय मोदींसाठी काय काय करणार हे त्यांनाच माहीत….
ती व्यक्ती कोण?
दिल्लीच्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या काही नेत्यांची बैठक सुरू होती. अजेंड्यावर फक्त संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीचा मुद्दा होता. साहजिकच ही बैठक लगेच संपणार होती. त्यामुळे वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. काही कॅमेरे आवारात, काही आतल्या मोकळ्या जागेत विखुरलेले होते. प्रतिनिधी गप्पा मारण्यात गुंग असताना क्लबच्या आवारात एक कार येऊन थांबली आणि त्यातून व्यक्ती लगबगीने बाहेर पडली. ही व्यक्ती स्मृती इराणींसारखी दिसत होती. या व्यक्तीला ओळखण्यापूर्वीच ती क्लबमध्ये निघून गेली. कदाचित इराणी स्वत: असाव्यात किंवा त्यांच्या सारख्या दिसणाऱ्या अन्य कोणी. पण, त्यानिमित्त इराणींची चर्चा रंगली. गेल्या वर्षी अमेठीतून पराभूत झाल्यानंतर त्या दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी फारशा दिसत नाहीत. त्यांनी राजकारण सोडल्याच्याही वावड्या कानी आल्या होत्या. त्या पुन्हा मनोरंजन क्षेत्रात जाणार असंही बोललं जात होतं. त्यांचं नाव कधी कधी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीही चर्चिलं जायचं. आता हे नाव मागं पडलं आहे. अमेठीमध्ये त्यांनी घर विकत घेतलं होतं. गेल्या वर्षात तरी त्या अमेठीत गेल्या नाहीत असं सांगितलं जातंय. स्मृती इराणी यांना मोदी सरकारमध्ये मोठं स्थान होतं. त्यांनी माहिती-प्रसारण मंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर अनेक जणांनी त्यांच्या कारभाराची धास्ती घेतली होती. मग, त्यांच्याकडं मनुष्यबळ विकास मंत्रालय दिलं गेलं. आता हे मंत्रालय शिक्षण मंत्रालय झालंय. तिथून त्यांची रवानगी वस्त्रोद्याोग मंत्रालयात झाली. तिथून त्या महिला-बालकल्याण मंत्रालयात गेल्या. मग, त्या मंत्रिमंडळातून गायब झाल्या. आता संसदेतून आणि कदाचित राजकारणातूनही!