ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला प्रशस्त अशा सॅटीस पुलाचे निर्माण काम सुरू असताना, दुसरीकडे पश्चिमेस असलेल्या सॅटीस पुलाची रया गेली. गावदेवीकडे जाणाऱ्या या पुलावर छप्परच नाही, तर जागोजागी उखडलेल्या फरशांमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अंध आणि दिव्यांग व्यक्तींसाठी ही वाट अधिकच धोकादायक ठरते. असे असतानाही महापालिका प्रशासनाचे या पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. जुन्या सॅटीस पुलाच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आता प्रवाशांतून जोर धरू लागली आहे.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळावा आणि पादचाऱ्यांनाही सुरक्षितरित्या स्थानक गाठता यावे यासाठी ठाणे महापालिकेने स्थानक परिसराच्या पश्चिमेस सॅटीस पुलाची निर्मिती केली होती. ठाणे शहरातील वागळे इस्टेट, घोडबंदर भागात अनेक कंपन्या, काॅल सेंटर, माहिती तंत्रज्ञान कार्यालये स्थापन झाल्याने जिल्ह्यातील विविध भागातून कामानिमित्ताने नोकरदार ठाणे स्थानकातून शहरात येत असतात. तसेच, ठाणे शहरातही मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. त्यामुळे शहरातील विविध भागातून नागरिक ठाणे स्थानकात किंवा परिसरात जातात. ठाणे स्थानक परिसरात दिवसाला किमान सहा ते सात लाख प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे येथील पश्चिमेकडील सॅटीस पुलाचा वापर अधिक होतो.

सॅटीसपुल ठाणे स्थानक परिसरातील एसटी थांबा आणि गावदेवी मंदिर येथे उतरतो. स्थानकाच्या इतर पुलांना हा सॅटीस पुल जोडला असल्याने ठाणे स्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी या पुलाचा अधिक वापर करतात. पुलावर ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेचा थांबा देखील आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्रीच्या वेळी पुलावर प्रवाशांची गर्दी असते. परंतु गेल्याकाही दिवसांपासून येथील गावदेवी मंदिराच्या दिशेने उतरणाऱ्या पुलावर अनेक ठिकाणी छप्पर गायब झाले आहे. पाऊस पडल्यास येथून प्रवाशांना भिजत जावे लागते. काही ठिकाणी छप्पराला गळती लागली आहे. येथील सुरक्षा कुंपनावर बेकायदेशीररित्या जाहीराती चिटकविण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी विद्युत तारा लोंबकळत असल्याचे दिसते. अनेक ठिकाणी पुलाच्या फरशा उखडल्या आहेत. तर काही ठिकाणी जिन्यांवरील फरशा उखडल्या आहेत. या पुलावरून अंध किंवा अपंगांना देखील ये-जा करतात. त्यामुळे एखादी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सॅटीस पुलावर ठिकठिकाणी फरशा फुटल्या आहेत. अनेकदा फुटलेल्या फरशांमुळे पडण्याची भिती असते. छप्परही ठिकठिकाणी गळते. त्यामुळे पाऊस पडल्यास छत्री घेऊन पुलावरून चालावे लागते. – रमेश मेश्राम, प्रवासी.