गेल्या काही दिवसांपासून बारवी धरणक्षेत्राला जोरदार पावसाची प्रतिक्षा होती. अखेर बारवी धरण क्षेत्रात गेल्या २४ तासात १२६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे बारवी धरणात २४ तासात ८ दशलक्ष घनमीटर पावसाची भर पडली आहे. या पावसामुळे एकाच दिवसात बारवी धरणाचा पाणीसाठा ३४ टक्क्यांवरून थेट ३७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मिरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, सिडको, उल्हासनगर, अंबरनाथ पालिका तसेच विविध औद्योगिक क्षेत्र आणि ग्रामीण भागाला पाणी पुरवठ्यासाठी महत्वाच्या असलेल्या बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या काही दिवसात घट झाली होती. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत होती. त्याचवेळी गेल्या आठवडाभरापासून पडणाऱ्या पावसाने धरणक्षेत्राकडे मात्र पाठ फिरवली होती. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत किंचीत वाढ होत होती. मात्र धरणक्षेत्राला जोरदार पावसाची प्रतिक्षा होती. अखेर गेल्या २४ तासात धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठा कमीच –

एमआयडीसी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात बारवी धरणक्षेत्रात १२६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अवघ्या २४ तासात बारवी धरणाचा पाणीसाठा ८ दशलक्ष घनमीटरने वाढला आहे. सध्या बारवी धरणात १२५.६४ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. बुधवारी हाच पाणीसाठा ११७.५३ दशलक्ष घनमीटर इतका होता. त्यामुळे एकाच दिवसात बारवी धरणातील पाणी ३४ टक्क्यांवरून थेट ३७ टक्क्यांवर गेले आहे. असाच पाऊस धरणक्षेत्रात कायम राहिल्यास येत्या बारवी धरण वेगाने भरेल अशी आशा व्यक्त होते आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या २४ तासात जरी जोरदार पाऊस झाला असला तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठा कमीच आहे. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी बारवी धरणात ४० टक्के पाणीसाठा होता.